Amol Kolhe | Shivajirao Adhalrao Patil
Amol Kolhe | Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

राजकारणाला आव्हान-प्रतिआव्हानांचा अस्सल गावरान तडका; निमित्त शर्यतीचे

सरकारनामा ब्युरो

शिरुर : शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज बैलगाडा शर्यंतीपुढे घोडीवर बसून दावडी निमगावचा घाट गाजवला, आणि आठवण झाली ती थेट माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी दिलेल्या आव्हानाची. या आव्हानाच्या पूर्तीमुळे राज्याला आज आव्हान-प्रतिआव्हानांचा अस्सल गावरानी तडका असलेलं राजकारण पाहायला मिळाल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा राज्यभरात शिरुरचे राजकारण गाजत आहे आणि राजकारण असावं तर असं या शब्दात या प्रसंगाचं वर्णन केलं जातं आहे. (Amol Kolhe viral video)

शिरुर-चाकण-मावळं या भागात बैलगाडा शर्यतींचा मोठा पगडा आहे. याठिकाणी या बैलगाडा शर्यतींच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल होतं असल्याचं किंबहुना एक समांतर अर्थव्यवस्था उभी असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांचा गावोगावी प्रचार सुरु असताना अमोल कोल्हे यांनी शिरुरमध्ये २ आश्वासन दिली. त्यातील त्यांचे पहिले आश्वासन होते ते, अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि सर्वकाळ तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार. तर ज्या दिवशी बैलगाडा शर्यती सुरू होतील, तेव्हा हा तुमचा पठ्या शर्यतीतील पहिल्या बारीसमोर घोडी धरणार, हे त्यांचे दुसरे आश्वासन होते.

कोल्हेंच्या या आश्वासनाची आठवण ११ जानेवारी रोजी माजी खासदार अढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यत सुरु झाल्यानंतर त्यांना करुन दिली. आढळराव म्हणाले, बैलगाडा शर्यतींसाठी खासदार कोल्हे यांना जाहीर आमंत्रण दिले होते. तुम्ही निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी का होईना, लांडेवाडीत आमच्या घाटात या आणि घोडीवर बसा, असा खोचक टोला त्यांना लगावला होता. मात्र, कोल्हे तेव्हा आले नाहीत. त्यावर ते आले नाहीत आणि येणार नव्हतेच, असा टोला त्यांना लगावला. त्यानंतर नुकतेच आढळरावांनी कोल्हे यांना पुन्हा डिवचले.

अखेर अमोल कोल्हे यांनी हे आव्हान स्विकारले. त्यामुळे पहिल्या बारीत नाही तरी निदान मानाच्या घाटात तरी घोडीवर बसण्यासाठी कोल्हे यांनी तयारी केली आणि आज सकाळी ते दावडी निमगावच्या घाटात दाखल झाले. आज दावडी निमगावच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीची बारी भरवण्यात आली होती. यामध्ये एकूण ३५० बैलगाडा मालक सहभागी झाले होते. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या बारीत त्यांनी बैलगाडापुढे घोडीवर बसून दावडी निमगावचा घाट गाजवला आणि आपला शब्द जोडीला अढळरावांचे आव्हान असं दोन्ही पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी दंड देखील थोपटले.

आज या सगळ्यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, ज्यांची संसदेतील उपस्थितीच ५० ते ५५ टक्के आहे, १५ वर्षाच्या कालावधीत ज्यांना आपल्या भाषणातून एकदाही छाप पाडता आली नाही. अशा लोकांच्या आक्षेपाला उत्तर देणे मला योग्य वाटत नाही. राहिला प्रश्न लांडेवाडीत बसण्याचा, तर जिल्ह्यात पहिली शर्यत झाली, तेव्हा संसदेचे अधिवेशन सुरु होतं आणि बसायचं असंतं तर तिकडेही बसू शकलो असतो. पण तिकडे बसलो असतो तर त्यांना जास्त त्रास झाला असता, अन् वयोमानानुसार त्यांना त्रास होऊ नये अशी माझी इच्छा होती. मात्र घोडी धरेल की नाही अशी शंका होती, त्यांना आज उत्तर मिळालं आहे, हात सोडून अख्खा घाट चालवलाय, असंही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT