Shrirang Barne, Sunil Shelke
Shrirang Barne, Sunil Shelke sarkarnama
पुणे

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे खासदार बारणे अन् आमदार शेळकेंना तर निमंत्रणच नव्हते...

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज देहुमध्ये संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, हा कार्यक्रम देहू संस्थानचा असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधिंना निमंत्रण नसल्यामुळे त्यावरुन आर्श्चय व्यक्त होत आहे.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आणि मावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelake) यांना निमंत्रण नव्हते. या दोघांच्या मतदारसंघात हा कार्यक्रमात होता. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. याविषयी 'सरकारनामा'शी बोलताना बारणे म्हणाले, ``मी संत तुकाराम महाराजांचा भक्त आहे. पदावर नसल्यापासून मी वारीत सहभागी होत आहे. या कार्यक्रमाला मला जायला आवडले असते. हा देहू संस्थानचा कार्यक्रम होता. पण भाजपने तो कार्यक्रम आयोजित केला आहे, असे चित्र निर्माण झाले. यामध्ये पक्षीय राजकारण करणे योग्य नव्हते. या कार्यक्रमापासून स्थानिक प्रतिनिधींना दूर ठेवणे योग्य नव्हते. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असूनही निमंत्रण नसल्याने मला जाता आले नाही. माझी कोणावरही नाराजी नाही, पण भाजपने (BJP) हा कार्यक्रम हायजॅक केला.`` उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तरी भाषणासाठी कोठे संधी दिली, असाही सवाल बारणे यांनी केला.

आमदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे मत कळू शकले नाही. स्थानिक आमदार आणि खासदार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नव्हते की नाही, याबाबत देहू संस्थानशी भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यांची बाजू समजताच त्यांचे स्पष्टीकरण देण्यात येईल. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांची गर्दी लक्षात येण्यासारखी होती. देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे यांनी भाजपचे माजी राज्यमंत्री आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना या कार्यक्रमाच्या नियोजनाचे श्रेय आपल्या प्रास्ताविकात दिले. त्यावरूनही अनेकांच्या भुवया उंचावल्या.

या कार्यक्रमाचे पडसाद राजकारणात पडले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण करु दिले नाही. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले.आहे. अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भाषण करु द्यायला हवे होते, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पंतप्रधान काय म्हणाले?

शिळा मंदिर केवळ भक्तीच्या शक्तीचे केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्यालाही सशक्त करणारे केंद्र असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. "मस्तक माझे पायांवरी, या वारकरी संतांच्या", या ओळींनी भाषणाची सुरूवात केली. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अंभगातील अनेक ओळी म्हणत त्या आजच्या काळात देखील कशा उपयुक्त आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT