Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis : बहिणीला पैसे मिळून नये म्हणून सावत्र भावांचे प्रयत्न; फडणवीसांनी सगळंच सांगितलं

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि सावत्र भावांच्या पोटात दुखू लागले. त्यांनी ही योजना बंद पाडण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र त्यांचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडण्यात आले, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

आता अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असून उर्वरित महिलांनाही लवकरच पैसे मिळतील, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुण्यात रविवारी औपचारिक शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी Devendra Fadnavis महाविकास आघाडीतील नेत्यांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेला विरोधकांनी कडाडून विरोध केला. त्यासाठी ते कोर्टात गेले. मात्र तेथे त्यांची डाळ शिजली नाही. त्यानंतर त्यांनी योजना बंद पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी महिलांचे अर्ज भरून घेतले.

त्या अर्जात त्यांनी महिलांऐवजी पुरुषांचे, वाहनांचे, बागेचे फोटो वापरले. त्यातून अर्ज बाद होतील याची काळजी घेतली गेली. यासह आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा टाकला. त्यामुळे पोर्टल बंद पाडण्याचे प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यात खटाखट नाही तर फटाफट योजना

आपले देना बँक सरकार आहे. लेना बँक नाही. मागचे सरकार वसूली सरकार होते. आजपर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. मात्र सर्व महिल्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत. आतापर्यंत 31 जुलैपर्यंत आलेल्या अर्जांचे पैसे आहेत. आता अर्ज येणाऱ्या महिलांनानाही पैसे मिळणार आहे. ही योजना खटाखट नाही तर फटाफट आहे.

भारत विकसित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांचे स्वप्न आहे. त्यासाठी महिलांचा विकास महत्त्वाचा आहे. त्यातूनच मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू केल्या. यातूनच लखपती मुलगी, फी माफी, रोजगार आणि लाडकी बहीण या योजना राबवल्या गेल्या.

कष्टकरी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात आणले तर राज्याच्या विकास कोणीही रोखू शकणार नाही. पूर्वी योजनांमध्ये दलालांचे निभावत होते. आता थेट खात्यात पैसे जमा होत आहे. याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधले.

1500 रुपयांत तुम्ही महिलांना विकत घेता का, अशी टीका विरोधकांनी केली आहे. या टीकेला उत्तर देताना आई आणि बहिणीचे प्रेम कुणीही विकत घेऊ शकत नाही. माता भगिनींच्या प्रति आमची ही कृतज्ञता आहे. ही ओवाळणी म्हणून ही रक्कम दिली जात आहे, असे म्हणत फडणवीसांनी महिल्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम कधीही माघारी घेणार नाही, असा विश्वास दिला.

...अन्यथा पाच वर्षांची तरतूद केली असती

फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री असताना अनेक योजना सुरू केल्या. मात्र मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने माझ्या सर्व योजना बंद केल्या. आज चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडून काही चुकले आणि सरकार बदलले तर येणारे सरकार आले तर ते सर्व योजना बंद करतील, अशी भीतीही फडणवीसांनी व्यक्त केली.

ही योजना बंद होणार नाही. अर्थमंत्री अजितदादांनी Ajit Pawar मार्चपर्यंत सर्व व्यवस्था केली आहे. बजेटमध्ये एका वर्षाचे पैसे ठेवता येतात. जर पाच वर्षांचे ठेवता आले असते, तर सर्व कामे बाजूला ठेवून पाच वर्षांचे पैशांची तरतूद केली असतील. राज्यातील ही योजना बंद होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT