Mahesh Landge, Ashvini Jagtap  Sarkarnama
पुणे

Nagpur Winter Session : भाजपचे आमदार लांडगे, जगताप आणि राष्ट्रवादीच्या मोहितेंची विधानसभेत या प्रश्नांवर झाली युती

Uttam Kute

Nagpur News : महाराष्ट्राची ‘गंगा’असलेली इंद्रायणी नदी गटारगंगा झाल्याने तिचे प्रदूषण रोखून पावित्र्य टिकवण्यासाठी भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या अश्विनी जगताप आणि खेड-आळंदीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) दिलीप मोहिते-पाटील यांची विधानसभेत बुधवारी युती झाल्याचे दिसले.

इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्याच्या गंभीर आणि ज्वलंत प्रश्नावर त्यांची लक्षवेधी क्लब करून चर्चेसाठी घेण्यात आली. त्यावर इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणार असल्याचे सांगत डीपीआर तयार करुन तीन महिन्यात टेंडर काढले जाईल,असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडील नगरविकास विभागाची जबाबदारी देण्यात आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

राज्य सरकारच्या जोडीने पिंपरी महापालिकेनेही इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्याकडे कसे लक्ष देण्याची गरज आहे,असा मुद्दा लांडगेंनी मांडला. पुररेषेत झालेली बांधकाम,एमआयडीसीसाठी नसलेला एसटीपी,त्यामुळे नदीपात्रात थेट सोडण्यात येणारे दुषित रासयनिक पाणी,नदीकाठचा बेकायदेशीर भंगार व्यवसाय यामुळे इंद्रायणी प्रदूषित झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने मंजूर केलेला ९९५ कोटी रुपयांचा नदीसुधारचा डीपीआर केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत असून त्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी केली.तर,जगताप यांनी दररोज शहरात निर्माण होणारे ४७ एमएलडी सांडपाणी त्यावर प्रक्रिया न करता तसेच नदीत सोडले जाते,असे सांगत पिंपरी महापालिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.एमपीसीबीच्या पाहणीत शहरातील मुळा,इंद्रायणी, पवना या तिन्ही नद्यांचे पाणी प्रदूषित झाल्याचे व त्यात बीओडी आणि सीओडी दुप्पट असल्याकडे लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रात्रीस खेळ चाले...इंद्रायणीतीरी कत्तलखान्याचा

इंद्रायणी नदीपात्रात भंगार जाळले जात असल्याने ती प्रदूषित होत आहे.त्याबाबत पिंपरी महापालिकेकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याबद्दल लांडगेंनी खंत व्यक्त केली. या नदीकिनाऱ्यावरील अनधिकृत गोडाऊन आणि रात्रीच्या वेळी तिथे चालणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखान्या मुळे ती अधिक प्रदूषित झाल्याचे त्यांनी सांगितले.

हा सर्वाधिक गंभीर मुद्दा असल्याचे या चर्चेत भाग घेताना मोहिते-पाटील म्हणाले. कारण या कत्तलखान्याचे इंद्रायणीत सोडलेले पाणी आळंदीत तीर्थ म्हणून पिले जाते,याकडे त्यांनी लक्ष वेधले.इंद्रायणी अतिप्रदूषित झाल्यामुळे तिच्या पात्रा लगतची शेती ही नापिक झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

वरील तिन्ही आमदारांच्या प्रश्नांच्या भडीमाराला उत्तर देताना इंद्रायणीसह पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतील पवना नदीचेही  प्रदूषण कमी करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. अनधिकृत व्यवसायांमुळे या नद्यांचे पात्र प्रदूषित होत असल्याने अशा बेकायदेशीर उद्योगांवर तात्काळ कारवाईचे आदेश पिंपरी महापालिकेला देण्यात येतील,असे ते म्हणाले.

या दोन्ही नद्या प्रदूषित करणाऱ्या एमआयडीसीतील उद्योगांच्या ९९५ कोटींच्या एसटीपीच्या डीपीआरला मंजूरी देण्याकरिता केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT