Gajanan Chinchwade
Gajanan Chinchwade Sarkarnama
पुणे

चिंचवडेंच्या मृत्यूचे सत्तेसाठी भाजपकडून राजकारण अत्यंत दुर्देवी!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwade) नेते व शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे शनिवारी (ता.५) ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याचा राग धरून राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांच्यावर २९ वर्षांपूर्वी झालेल्या जमीन खरेदी प्रकरणात पोलिसांना गुन्हा दाखल करायला लावला. त्याचा तणाव आल्याने व मानसिक खच्चीकरण झाल्याने चिंचवडेंचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूस महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असून, सदर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणारे त्यांचे मारेकरी आहेत, असा आरोप भाजपने शनिवारी केला होता. त्याचा राष्ट्रवादीने रविवारी (ता.६) इन्कार केला. चिंचवडेंच्या मृत्यूचे सत्तेसाठी राजकारण करणे हा अत्यंत दुर्देवी प्रकार असून स्वत:चे पाप झाकण्यासाठी भाजपचा हा खटाटोप असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीने केला.

चिंचवडेंच्या निधनानंतर भाजपच्या शहरातील माजी खासदार अमर साबळे, महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके व इतर नेत्यांनी पत्रकारपरिषद घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप काल केले होते. ते राष्ट्रवादीचे माजी महापौर व सभागृहातील सर्वात ज्येष्ठ विद्यमान नगरसेवक योगेश बहल यांनी खोडून काढले. शहराच्या राजकीय पटलावरील एका कष्टाळू आणि सामाजिक भान असलेल्या राजकीय व्यक्तीमत्त्वाचे निधन झाले असताना त्यांच्या अंत्यविधीपूर्वीच भाजपने स्वत:चे पाप झाकण्यासाठी त्यांच्या मृत्यूचे राजकारण करणे हे अत्यंत दुर्देवी असल्याचे ते म्हणाले.

चिंचवडेंवर दाखल झालेल्या गुन्ह्यासाठी राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता अथवा मविआ सरकारमधील कोणाचाही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. चिंचवडे हे सामाजिक क्षेत्राची भान असलेले व सर्वसमान्यांच्या सुख- दुखा:त सहभागी होणारे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाचे दुख: सर्वांना झाले आहे. त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो जमिनीच्या वादातून झाला होता. त्याच्याशी राष्ट्रवादीचा अथवा महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याचा कसलाही संबंध नाही. चिंचवडे यांचे निधन होऊन काही तासही उलटले नाहीत, तोच भाजपाने या प्रकरणाचे राजकारण करणे ही अत्यंत दुर्देवी बाब आहे, असे बहल म्हणाले.

चिंचवडे कुटूंबिय हे भाजपमध्ये काही महिन्यांपूर्वीच आले होते. दुखा:च्या या क्षणी त्यांच्या कुटूंबियांना सावरणे, आधार देणे गरजेचे असताना केवळ राजकारण करणे आणि आपले पाप झाकण्यासाठी भाजपाने पत्रकार परिषद घेऊन जे आरोप केले त्याचा आम्ही निषेध करतो, असे बहल म्हणाले. भाजप निव्वळ तथ्यहिन आरोप करत आहेत. सत्ता आणि राजकारण हे नेहमीच सुरू असते. मात्र, दुख:द प्रसंगी भाजपच्या नेत्यांनी घाणेरडे राजकारण न करता चिंचवडे कुटूंबियांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज असताना नको ते उद्योग करू नयेत. नाहक राष्ट्रवादीची व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करू नये. चिंचवडेंचे निधन ही मनाला वेदना देणारी घटना असून याप्रसंगी त्यांच्या कुटूंबाच्या पाठिशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे बहल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT