Sanjay Raut and Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Mahavikas Aghadi: इच्छा आहे तोपर्यंत आघाडीमध्ये राहू म्हणणाऱ्या राऊतांना अजितदादांनी दिल्या शुभेच्छा !

मिलिंद संगई

Ajit Pawar News: शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज (दि.१८ जून) मुंबईत पार पडला. या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या चर्चांवर टीका करत बोलताना "आपली इच्छा आहे तोपर्यंतच महाविकास आघाडीमध्ये राहू", असं मोठं विधान संजय राऊतांनी केलं.

संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे की, आमची आघाडी पंचवीस वर्षे टिकणार आहे. मात्र, आता जर त्यांना स्वतःच सरकार यावं, असं वाटत असेल तर त्यात मला काही चुकीचं वाटत नाही", असं अजित पवार म्हणाले आहेत. ते आज माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार यांनी आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत केले. "संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले तर कधीच कुणालाही काही कमी पडणार नाही, मोठ्या भक्तीभावाने मी आज बारामतीकरांच्यावतीने पालखीचे स्वागत केले", असं त्यांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले, "आपण कोणतेही साकडे घातले नाही. प्रत्येक वेळेस काही साकडेच घातले पाहिजे, असं काही नसतं. संत तुकाराम महाराजांनी घालून दिलेल्या विचारावर चालत राहणं, त्यांचे विचार अंमलात आणणं गरजेचं आहे. याच भावनेतून मी पालखी सोहळ्यात सहभागी झालो. मलाही त्याचे वेगळे समाधान मिळाले", असं ते म्हणाले.

राऊतांच्या विधानावर अजितदादा काय म्हणाले?

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊतच म्हणायचे, आमची आघाडी पंचवीस वर्षे टिकणार आहे. आता जर त्यांना स्वतःच सरकार यावं असं वाटत असेल तर त्यात मला काही चुकीचं वाटत नाही", अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्याबरोबरच संजय राऊत यांनी स्वबळाचं वक्तव्य केलं. याबाबत बोलताना त्यांनी भाजपविरुध्द लढण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत. याची आठवण त्यांनी करुन देत त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखविली आमच्या त्यांना शुभेच्छा, असं अजित पवार म्हणाले.

अजितदादांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

"ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुख्यमंत्री असताना सलग तीन वर्षे मी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या पूजेसाठी गेले होते. तसेच उपमुख्यमंत्री असताना कार्तिकी एकादशीच्यानिमित्ताने पूजेसाठी मी गेलो होतो. पूर्वी बारामतीला शिकायला होतो, काटेवाडीला शेती होती. काटेवाडीमध्ये असताना पूर्वी आमच्या घरीही बारा बैल असायचे. नंतर ट्रॅक्टर आले, आजही दोन बैल माझ्याकडे आहेत.

शेतकरी आणि बैलाचं वेगळ नातं असतं. आज सारथ्य केलं याचं समाधान आहे. हे करतानाही माझ्या मनात भीती होती की हे नियमाप्रमाणे आहे की नाही, मी त्यांना तसे विचारलेही पण त्यांचा आग्रह होता, त्यामुळे मी सारथ्य केले. बैलगाडीची सवय असल्याने त्यात काही अवघड नसतं. यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आशिर्वाद राज्यातील जनतेला मिळावेत, सर्वांना सुखशांती नांदावी, चांगला पाऊस पडावा हीच इच्छा व्यक्त केली", असं सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT