NCP News : dhananjay Chandrachud
NCP News : dhananjay Chandrachud Sarkarnama
पुणे

NCP News : होर्डींग राष्ट्रवादीचे, आवाहन सरन्यायाधीशांना; अन् त्यासाठीचे शब्द भाजपाच्या दिवंगत नेत्याचे !

सरकारनामा ब्यूरो

प्राची कुलकर्णी -

Pune News : राज्यातील सत्तांतरावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी गुरूवारी संपली. न्यायालयाचा निर्णय येत्या काही दिवसात अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी आपल्यापरीने न्यायालयातील सुनावणीच्या किंवा सरन्यायाधीशांनी केलेल्या टिपण्णीच्या आधारे अर्थ लावायला सुरूवात केली आहे.

सरन्यायाधीशांच्या विधानांचा अर्थ लावत कुणी सरकार जाणार, तर कुणी सरकार राहणार, असे आडाखे बांधत आहेत. काही वकीलांचे दाखले देत विविध अंदाज व्यक्त करीत बातम्यादेखील चालवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या (NCP) एका पदाधिकाऱ्यांने थेट सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना आवाहन करणारी होर्डींग तयार केली आहेत.

सरन्यायाधीशांना लोकशाही वाचवण्याचे आवाहन करताना राष्ट्रवादीने भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधानांच्या विधानांचा आधार घेतला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी अल्पमतातील सरकारच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याआधी लोकसभेत केलेल्या भाषणाचा आधार घेण्यात आला आहे. ‘सरकारे आएंगी, जाएंगी,पार्टिया बनेगी,बिघडेगी मगर ये देश रहना चाहिए’’ या वाजपेयींच्या ऐतिहासिक भाषणातील वाक्यांचा दाखला देण्यात आला आहे. १९९८ साली अल्पमतातील सरकारच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याआधी वाजपेयी यांनी लोकसभेत केलेले भाषण त्यावेळी खूप चर्चेचे ठरले होते. राज्याच्या आजच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने वाजपेयींच्या त्या वाक्यांचा नेमका वापर केला आहे.

जगात सर्वात मोठी मानली जाणारी आपली लोकशाही सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे. अशावेळी देशात खरचं लोकशाही उरली आहे का ? असा प्रश्‍न पडतो, असे या होर्डींगच्या माध्यमातून सरन्यायाधीशांना केलेल्या आवाहानात म्हटले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा लढा देशातील लोकशाहीसाठी महत्वाचा आहे. अशावेळी देशातील लोकशाही वाचविण्यासाठी आपण योग्य निर्णय घ्याल, असे आवाहन सरन्यायाधीश चंद्रचूड यांना करण्यात आले आहे.

लोकशाहीच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या निकालाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. पाचजणांच्या खंडपीठापुढे या या खटल्याची सुनावणी झाली. विशेष म्हणजे या खंडपीठाचे प्रमुख असलेले न्यायमूर्ती चंद्रचूड हे महाराष्ट्रातील आहेत. पुणे जिल्ह्यात त्यांचे मूळ गाव आहे.

गुरूवारी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राजकीय अभ्यासक तसेच ज्येष्ठ वकीलांच्या अंदाजाच्या आधारे बातम्या चालवल्या जात आहेत. अंदाज आणि बातम्या काहीही येत असल्या तरी येत्या काही दिवसात निकाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, सरकार जाणारच असे काहीजण छातीठोकपणे सांगू लागले आहेत तर सरकार जाऊ शकणार नाही, असे सांगणाराही एक वर्ग आहे. त्यामुळे निकाल येईपर्यंत अंदाज सुरू राहणार असला तरी थेट देशाच्या सरन्यायाधीशांनाच अशाप्रकारे आवाहन करीत देशाची लोकशाही वाचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या होर्डींगचीही चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT