Chhatrapati Shivaji Maharaj Statue  Sarkarnama
पुणे

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : पुतळ्याच्या मुद्द्यावरुन कुणी काढली पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची नियत

Sudesh Mitkar

Pune News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे. या घटनेबाबत सरकारला जबाबदार धरत जागोजागी आंदोलन करण्यात येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच, नित्कृष्ट दर्जाचा पुतळा उभारणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेधही करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 फूट उंच पुतळ्या सोसाट्याच्या वाऱ्यात सोमवारच्या सकाळी अचानक कोसळला. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आठ महिन्यापूर्वी 4 डिसेंबर 2023 रोजी 'नेव्ही-डे'निमित्त करण्यात आले होते. महाविकास आघाडीने या घटनेवरून राज्य सरकारला धारेवर धरत पुतळा कोसळल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या विरोधात राज्यभर जागोजागी आंदोलन करण्यात येत आहेत. पुण्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, "1961 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं उद्घाटन केलं होतं. तो पुतळा गेल्या 64 वर्ष सुस्थितीत असून त्याच्या चौथाऱ्याची वीट देखील अद्याप हलेली नाही". लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आठ महिन्यापूर्वी घाई गडबडीत जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारला तो काल कोसळला. पंतप्रधानांची आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियत साफ नाही, असा घाणाघात प्रशांत जगताप यांनी केला.

निवडणुकांसाठी घाई

पुण्यात महाराष्ट्रात आणि जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची एकमेव आणि पहिली घटना आहे. कारण उद्घाटन करणारा आणि उद्घाटन करण्याची घाई करणारा यांची नियत आणि नीतिमत्ता साफ नव्हती. त्यामुळे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा पुतळा घाई गडबडीत उभारण्यात आला होता.

सरकारची नीतिमत्ता ढासळलेली

राज्यामध्ये तिघाडी सरकार असल्यामुळे ही परिस्थिती महाराष्ट्रावरती ओढवली आहे. या दुर्घटनेबाबत बोलताना राज्यातील मंत्री दीपक केसरकर यांनी हा अपघात असून पुढे काहीतरी चांगलं होणार असेल म्हणून हा अपघात घडला असेल, असं वक्तव्य केलं आहे. अशा प्रकारचा अपघात होणं हे जर या मंत्र्यांना चांगलं वाटत असेल, तर या सरकारची नीतिमत्ता काय आहे, हे यातून समोर येते. त्यामुळे पुढील दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळा कोसळला आहे, त्याचा धडा या राज्य सरकारला शिकवेल, असं जगताप म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT