Jitendra Awhad on Free houses for MLA, Free houses for MLA News
Jitendra Awhad on Free houses for MLA, Free houses for MLA News Sarkarnama
पुणे

ठाकरे सरकारचा युटर्न ; आमदारांना मोफत घर नाही, आव्हाडांचे स्पष्टीकरण

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण भागातील आमदारांना कायमस्वरूपी घरे देण्याची घोषणा गुरुवारी अधिवेशनात केली. पण आज या घोषणेबाबत महाविकास आघाडी सरकारने युटर्न घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी टि्वट करुन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Free houses for MLA News)

''आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे,'' असे स्पष्टीकरण आव्हाडांनी केले आहे.

आमदारांना घर देणार यावरून गदारोळ झाल्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray)सोशल माध्यमांवर ट्रोल झाले आहेत. एकीकडे एसटी कामगारांचा, कोविड भत्ते, शेतकरी, नोकर भरती यासाठी सरकारकडे पैसे नाही. असे असताना आमदारांना फुकट घर का ? असा सवाल मनसेनं केला आहे.

भाजपचे नेते राम कदम यांनीही ठाकरे सरकारच्या या घोषणेवर टीका केली आहे. कदम म्हणाले, ''आमदारांना मोफत घरे देण्याआधी सरकारने कोरोना काळात लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, कंपाउंड यांना घरे द्यायला हवी होती. शाहिद सैनिकांच्या कुटुंबियांना घरे द्यायला हवी. कोणाला घरे देणे गरजेचे आहे हे सरकारने ठरवले पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री यांना पत्र देणार आहोत,''

''अनेक आमदार बांधकाम व्यावसायिक आहेत. अनेक आमदारांची मुंबईत घर आहेत. मग यांना घर कशाला? स्वतःचे सरकार स्थिर करण्यासाठी आमदारांना घराची खिरापत वाटत आहात का?'' असा खोचक सवाल मनसेने ठाकरे सरकारला केला आहे. ''मुख्यमंत्र्यांना आमदारांना जर घर द्यायचेच असेल तर जनतेच्या पैशातून कशाला घर देता. स्वतःच्या मातोश्री Construction मधून मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना घराची खिरापत द्यावी,'' असा टोलाही मनसेनं लगावला

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले, ''बीडीडी चाळींना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायला काही हरकत नाही. पण, जे बाळासाहेबांचे विचार पाळत नाहीत त्यांनी नाव देऊन काय फायदा,''

''हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि अपूर्ण निर्णय आहे. आपण इथंच थांबू नये. त्यांचं दारिद्र्य लक्षात घेऊन दर महिन्याला तीस किलो गहू, तीस किलो तांदूळ, पाच किलो तुरीची डाळ, दहा किलो तेल, एक बाटली खोबरेल तेल, दहा किलो साखर इत्यादी देण्याचाही विचार करावा. दर दसऱ्याला आणि मकरसंक्रांतीला धोतर जोडी, दोन पॅन्ट, दोन शर्ट, साडी सुद्धा दिलेच पाहिजेत. तातडीने ह्या सुधारणा व्हाव्यात,'' असा टोला मराठीमाती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी लगावला. ''फक्त सरकारच अभिनंदन करून जमणार नाही. तर कधी नव्हे ते टाळ्या वाजवून समर्थन देणाऱ्या विरोधी पक्षाचे देखील करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,'' असे त्यांनी म्हटलं आहे.

''दारिद्रय रेषेखाली येणाऱ्या सर्व आमदारांना फुकट मध्ये घर देणाऱ्या महा विकास आघाडी सरकारचे अभिनंदन, खर तर आज कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत एवढं मोठं कार्य या सरकार ने केलं आहे. आता फक्त पुरवणी बिलात आमदाराच्या मुलांच्या लग्न कार्यासाठी अमुक अमुक तरतूद केली तर नवल नको वाटायला,,'' असे सचिन सुरवसे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT