Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

माझ्या सभेतील शेवटचा माणूसही उठला नाही; कारण मी गद्दारी केलेली नाही : अजित पवारांनी शिंदेंना सुनावले

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : एकमेकांना गद्दार म्हणून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का? कुणी कसंही माणसं फोडतंय. लोकशाहीचा पार खेळखंडोबा झालाय आणि म्हणतात सर्वसामान्यांचं सरकार आहे; माणसं सभेला आपणहून आली होती. अरे आपणहून आलेली माणसं मग उठून का गेली? माझ्या आजच्या सभेला शेवटचा माणूससुद्धा उठला नाही. कारण मी गद्दारी करून इथं बसलो नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा समाचार घेतला. (Not even the last man in my assembly rose; Because I have not committed treachery : Ajit Pawar)

दरम्यान, 'हे पांढरे कपडे घालून आले, गाडीतून उतरले, पायऱ्या चढले, आता वर आले,’ असं काय काय सांगून दसऱ्यादिवशी नको नको केलं. महागाई, बेरोजगारीवर कुणी बोलायला तयार नाही, असं सांगून त्यांनी माध्यमांनाही फटकारले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री दत्तात्रेय भरणे होते. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, संभाजी होळकर, माणिक झेंडे, दत्तात्रय येळे, सतीश खोमणे उपस्थित होते.

दोन लाख तरूणांना रोजगार देऊ शकणारा वेदांता का गेला, कांदा उत्पादकांच्या व्यथा, केंद्राचा साखर कोटा बंद करू याबाबत कुणी बोलायला तयार नाही. हे त्यांना गद्दार म्हणतंय, ते ह्यांना गद्दार म्हणतात. कुणीही काहीही करतंय. सरकारला स्थिरता नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत चाललीय. कोण किती दिवस खुर्चीवर बसेल, हेच त्यांना कळेना, असेही पवार म्हणाले.

या प्रसंगी आमदार संजय जगताप, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची भाषणे झाली. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी आभार मानले.

शिंदे-फडणवीसांना म्हटलं दिल्लीत जाऊन अमित शहांना बोला

केंद्र सरकार उत्तर प्रदेशाला डोळ्यापुढे ठेवून साखर निर्यातीचा कोटा कारखान्यांना ठरवून देत आहे. यूपीला बंदर जवळ नसल्याने निर्यात न करता कोटा विकतात. त्याचा महाराष्ट्राला टनाला शे-दोनशे रूपये फटका बसतो, असा स्पष्ट आरोप अजित पवार यांनी केला. तसेच, मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अतुल सावेंना सांगितलं दिल्लीत जाऊन अमित शहा, पियुष गोयल यांना बोला. गेल्या वर्षीप्रमाणेच कारखान्यांना आपापल्या पद्धतीने निर्यात करण्याची परवानगी द्या. महाराष्ट्राचे वर्चस्व असलेली साखरेची कलकत्ता बाजारपेठ त्यांनी काबीज केलीय. आपल्याला लोकल मार्केट किंवा निर्यात एवढाच पर्याय राहीलाय. त्यामुळे कोटा पद्धतीचे धोरण आजिबात होता कामा नये; अन्यथा राज्याचा साखर उद्योग धोक्यात येईल, अशी भूमिका मांडली.

उद्धवजींना सांगितलं असतं बास आता शिंदेंना करू

शिंदे सरकारने आमच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली. याबाबत आम्ही अनेकजण न्यायालयात गेलो आहोत. असा भेदभाव करून लोकांची कामे अडविणे योग्य नाही. उद्या सत्ताबदल झाल्यावर तुम्हालाही त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. तसेच, आमचं सरकार असताना कधी वाटलं नाही, एकनाथरावांना मुख्यमंत्री व्हायचंय. नाहीतर उध्दवजींना सांगितलं असतं, ‘बास झालं आता शिंदेंना करू. पण ते कधी निघून गेले कळलंच नाही,’ अशी खिल्लीही उडविली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT