Daund
Daund sarkarnama
पुणे

धक्कादायक : दौंडमध्ये तब्बल आठ हजार जणांची नावे मतदारयादीतून वगळण्याचा घाट

प्रफुल्ल भंडारी

दौंड : मतदार यादीतून अनेक वेळा मतदारांची नावे वगळी जातात. त्यामुळे आपल्या हक्कापासून नागरिकांना वंचित राहावे लागते. मात्र, दौंड (Daund) तालुक्यात तब्बल आठ हजार नागरिकांना मतदानापासून वंचीत ठेवण्यासाठी एक यंत्रणाच सक्रिय झाली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधीत नागरिकांचे आपल्याला निवडणुकीत (Election) मतदान होणार नाही, या संशयातून त्यांची नावे वगळण्याचा घाट घालण्यात आला आहे.

दौंड तालुक्यात मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी संघटितपणे एक यंत्रणा सक्रिय झाली आहे. तालुक्यातील मतदार यादीतील नावांना वगळण्यासाठी संशयास्पदपित्या ऑनलाइन हरकती घेण्यात आल्या आहेत. नावे वगळण्यासाठी हरकत घेतल्यानंतर संबंधित मतदारांना महसूल प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आला. मात्र, पंचनाम्यावर बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दौंड तालुक्यात सध्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविला जात आहे. मतदार यादीतील नावांसंबंधी दावे आणि हरकती स्वीकारण्याचा शेवटच्या दिवशी तब्बल ८ हजार ३४१ मतदारांच्या नावावर हरकती (नावे वगळण्याची मागणी) ऑनलाइन पध्दतीने करण्यात आली. हरकतींच्या आधारे संबंधितांना नोटिसा बजावल्याची औपचारिकता पूर्ण केली. मात्र, पंचनामा करताना ज्या मतदारांची नावे वगळण्यासाठी हरकत घेण्यात आली होती, छापील पंचनाम्यावर त्यांच्याच पालकांच्या बनावट स्वाक्षर्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. नोटीसा निघाल्या नसत्या तर संबंधितांना नाव वगळल्याचे थेट मतदानाच्या आधी कळाले असते.

दौंड तालुक्यात १ लाख ६० हजार ८४ पुरूष, १ लाख ४५ हजार ८३१ स्त्री व ०४ तृतीयपंथी, असे एकूण ३ लाख ०५ हजार ९१९ मतदार आहेत. आगामी तीन महिन्यात दौंड नगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.

हरकतींच्या आधारे सकाळी नोटीस बजावून दुपारी दौंड तहसील कार्यालयात कागदपत्रांसह बोलविणे चुकीचे आहे. गाडेवाडीत ज्यांनी आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीला पाच किंवा अधिक वेळा मतदान केले आहे, त्यांच्या नावांवरच मुद्दाम हरकती घेण्यात आल्या. आपल्याला या मतदारांचे मतदान होणार नाही. त्यापेक्षा त्यांची नावे वगळा, यासाठी ठरवून हा कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप गाडेवाडी येथील नीलेश गाडे यांनी केला आहे.

गावातून स्थलांतरित झाल्याचे कारण देत माझ्या नावाविषयी खोडसाळपणाने हरकत घेण्यात आली. त्यामुळे माझ्यावर स्थलांतर न केल्याचे सिध्द करण्याची वेळ आली. त्या माध्यमातून मला मानसिक त्रास देण्यात आला. हरकत घेणारा आमच्याच भाजप पक्षाचा आहे. संबंधितांना नोटीस देऊन मानहानीचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अॅड. अझरूद्दीन मुलाणी यांनी सांगितले.

हरकती ऑनलाइन आल्याने महसूल मंडल निहाय नोटिसा काढल्या आहेत. संबंधितांचे कागदपत्रे पाहून खात्री केल्यानंतरच हरकतींवर अंतिम निर्णय प्रांताधिकारी घेतील, असे तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT