Pune News: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निवडून येण्यास योग्य असलेल्या इच्छुकाला उमेदवारी मिळाली आहे. मात्र, त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांनी अपक्ष किंवा पक्षाच्या नावाने अर्ज भरून बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्यांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षातील नेत्यांचा खटाटोप सुरु झाला आहे. त्यात आता किती यश येणार याचे चित्र शुक्रवारी (ता. 2 जानेवारी) स्पष्ट होणार आहे. यात यश न आल्यास बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजपला (BJP) बसणार आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी युती, आघाडीमध्ये जागा वाटपावरून बिघाडी झाली आहे. जागा वाटपाचा घोळ अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु होता. भाजप व शिवसेनेची युती तुटली नाही असा दावा करून दोन्ही पक्षांनी 150 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. त्यामुळे युती तुटली आहे हे फिक्स असताना मतदारांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे.
तसेच दोन्ही राष्ट्रवादीत जागा वाटप झाले असले तरी दोन्ही पक्षांनी वाटपापेक्षा जास्त अर्ज दाखल केल्याने त्यांचे उमेदवार एकमेकांच्या समोर आले आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या महाविकास आघाडीत हा गोंधळ कमी झाला आहे.
भाजपकडे इच्छुकांची संख्या 2 हजार 300 पेक्षा जास्त असल्याने उमेदवार ठरविताना मोठी कसरत कोअर कमिटीला करावी लागली आहे. पक्षाच्या नेत्यांनी अनेकांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याने व उमेदवारी न दिल्याने नाराजी निर्माण झाली आहे. तसेच अनेकांची उमेदवारी शेवटच्या क्षणी कापली असल्याने नाराजांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्याने काहींनी अपक्ष किंवा पक्षाच्या नावाने अर्ज भरून नाराजीची दखल पक्षाच्या नेतृत्वाने घ्यावी यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्याने काहींनी अपक्ष किंवा पक्षाच्या नावाने अर्ज भरून नाराजीची दखल पक्षाच्या नेतृत्वाने घ्यावी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने सोमवारी आणि मंगळवारी या दोन दिवसात अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने अनेक इच्छुक नाराज झाले आहेत.
अनेक नगरसेवकांची उमेदवारी कापली आहे. त्यामुळे या इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष किंवा पक्षाच्या नावाने अर्ज भरले आहेत. महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 1 ते 41 या सर्व प्रभागात बंडखोरी झाली आहे.उमेदवारांना एबी फॉर्म देण्यावरून दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस, दोन्ही शिवसेनेत (Shivsena) घोळ झाला आहे. एका प्रभागात एका जागेवर दोनपेक्षा जास्त फॉर्म दिले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेनेने उमेदवारी यादी जाहीरच केली नाही.
शिवसेनेने ऐनवेळी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने एबी फॉर्म घेऊन कोण तरी अधिकृत उमेदवार व्हावे यासाठी निवडणूक कार्यालयात धावाधाव करावी लागली असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपमध्येच जास्त बंडखोरी झाली आहे.
उमेदवारी अर्ज शुक्रवारी (ता. २) मागे घेता येणार आहे. त्यामुळे सर्व पक्षातील महत्त्वाचे नेते, शहराध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्र्यांकडून या नाराजांना फोन केले जात आहेत. काही उमेदवारांनी नाराजांना भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.‘‘अधिकृत उमेदवारांशिवाय ज्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरले आहेत. त्या प्रत्येकाशी चर्चा सुरु आहे. माघारीच्या दिवशीपर्यंत सर्वजण अर्ज मागे घेतील.’’ असे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.