Praveen Mane-Deepak Jadhav
Praveen Mane-Deepak Jadhav  Sarkarnama
पुणे

ही दोस्ती तुटायची नाय...कट्टर विरोधक माने-जाधव १६ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर!

सचिन लोंढे

कळस (जि. पुणे) : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो अथवा शत्रूही नसतो. याचाच प्रत्यय इंदापूर (indapur) तालुक्यातील दोन तरुण दिग्गज नेत्यांच्या मनोमिलनाने दिसून आला. तालुक्यातील पळसदेव येथे झालेल्या एका सभेत पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती प्रवीण माने (Praveen Mane) आणि भाजपला (bjp) रामराम ठोकून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) सामील झालेले दीपक जाधव (Deepak Jadhav) यांनी जाहीरपणे सभेत आम्ही पुन्हा एकत्र आल्याची कबुली दिली. शिवाय १९९८ पासून २००६ पर्यंत असलेली आमची दोस्ती पुन्हा कायम राहील, याची ग्वाही दिली. (Praveen Mane-Deepak Jadhav came on the same stage after 16 years)

दरम्यानच्या, काळात वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात केलेले काम आणि २०१७ मध्ये एकमेकांच्या विरोधात लढविलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांच्या वाढलेली कटूता आता दीपक जाधव यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर पुसली जाईल का, याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

एकेकाळी दीपक जाधव व प्रवीण माने एकमेकांचे चांगले मित्र होते. दीपक जाधव यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका युवक अध्यक्षपदाची जबाबदारी असताना प्रवीण माने त्यांच्या सोबतीला होते. यातून ते तरुणांचे प्रश्न हाताळत होते. परंतु त्यावेळी काँग्रसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांनी दीपक जाधव यांना आपल्या पक्षात आणण्यात यश मिळविले. हर्धवर्धन पाटील यांना १९९५ पासून तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. सुरुवातीला अपक्ष व नंतर काँग्रेसच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी काँग्रेस पक्षाची ताकद तालुक्यात वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आपलेसे केले होते. त्यातच दीपक जाधव यांचा नंबर लागला होता. त्यातूनच राष्ट्रवादी व काँग्रेस हे प्रतिस्पर्धी पक्षाचे शहकाटशहाचे राजकारण सुरू झाले. यामुळेच माने व जाधव हे चांगले मित्र असूनही पक्षाच्या विचारधारेमुळे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनले.

राष्ट्रवादी काँग्रेसने २०१७ मध्ये प्रवीण माने यांना पळसदेव -बिजवडी या जिल्हा परिषद मतदार संघातून तिकीट देवून निवडणूक लढविण्याची संधी दिली, तर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माने यांचे कधीकाळाचे मित्र असलेले दीपक जाधव यांना माने यांच्या विरोधात जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार म्हणून घोषित केले. ही लढत चुरशीची झाली. यात माने यांचा विजय झाला. मात्र, मित्राकडून पराभव पत्करावा लागलेल्या जाधव यांना हा पराभव जिव्हारी लागला.

राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळविल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यास सुरुवात केली. भरणे यांना दुसऱ्यांदा इंदापूरचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांना राज्यमंत्रीपदाचीही लॉटरी लागली. त्याचा पुरेपूर उपयोग हा लोककल्याणकारी कामासाठी व पक्षाची ताकद वाढविण्यासाठी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून कधीकाळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले नेते आणि कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे त्यांचे काम सुरू आहे. त्यातूनच दीपक जाधव यांचे राष्ट्रवादीत पुनरागमन झाले आहे.

सुमारे १६ वर्षांच्या कालावधीनंतर माने व जाधव हे पळसदेव येथील सभेत एकाच व्यासपीठावर दिसून आले. याशिवाय त्यांनी आमची दोस्ती कायम राहील, याचे आश्वासनही दिले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्ष ज्याला तिकीट देईल, त्याचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे त्यांनी या वेळी बोलून दाखविले. या दोन कट्टर मित्रांचा विरोध मावळून त्यांची पुन्हा नव्याने झालेली दोस्ती त्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT