Ketan Agrawal Murder Case News Sarkarnama
पुणे

Ketan Agrawal Murder Case: प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काढला काटा! तिसऱ्या प्रयत्नात कट यशस्वी; जाणून घ्या मर्डर मिस्ट्री

Lohagad Ketan Vishal Agarwal Death: लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांना प्रेमसंबंध आणि नियोजित कटाचा संशय असून तपास वेगाने सुरू आहे.

Mangesh Mahale

Pune Police News: लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन विशाल अग्रवाल या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाने आता अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघात वाटत असलेल्या या घटनेमागे आता प्रेमसंबंध, फसवणूक आणि नियोजित कट असल्याचे उघड होत आहे.

तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या माहितीनुसार, केतनच्या होणाऱ्या पत्नीचा आणि तिच्या कथित प्रियकराचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे या प्रकरणाने पुणे, लोणावळा आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी याबाबत माहिती दिली. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून जवळचे संबंध होते. दरम्यान, सियाचा विवाह उद्योजक केतन अग्रवाल याच्यासोबत ठरला होता.

दोन्ही कुटुंबांत लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. राजस्थानमधील जयपूर येथे हा शाही विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र, या लग्नाबाबत सिया समाधानी नसल्याची बाब तपासादरम्यान समोर आली आहे.

लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटसाठी केतन आणि सियाला इंडोनेशियातील बाली येथे पाठवण्याचा निर्णय अग्रवाल कुटुंबीयांनी घेतला होता. त्यासाठी प्रवासाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. दोघे पुण्यातून मुंबई विमानतळावरही पोहोचले. मात्र, अचानक केतनचा पासपोर्ट हरवल्याचे समोर आले आणि हा दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर दोघेही पुण्यात परतले. तपास यंत्रणा आता या घटनेकडेही संशयाच्या नजरेने पाहत आहेत.

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांशी आपली व्यथा मांडली. “सियाच्या नातेवाईकांकडून हे स्थळ आले होते. फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. पण काही दिवसांनी तिचा स्वभाव बदलू लागला. केतन मला अनेकदा म्हणायचा, ‘पप्पा, तुम्ही तिच्याबद्दल नीट चौकशी केली होती का? ती सतत भांडते, चिडचिड करते.’ पण ती आपल्या नात्यातीलच मुलगी असल्याने आम्ही त्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही,” असे त्यांनी सांगितले.

विशाल अग्रवाल यांच्या मते, बाली ट्रिप रद्द झाल्यानंतर सियाचा लोहगड किल्ल्यावर जाण्याचा आग्रह वाढला होता. “ते एकदा जाऊन आले होते. त्यानंतर पुन्हा जायचा आग्रह सुरू होता. माझ्या पत्नीने केतनला विरोधही केला होता. पण तिसऱ्यांदा ते पुन्हा गेले. १८ तारखेला सकाळी ते किल्ल्यावर गेले आणि काही वेळातच फोन आला — तुमचा मुलगा किल्ल्यावरून पडला,” असे सांगताना विशाल अग्रवाल यांचा कंठ दाटून आला.

“माझा मुलगा इतका हुशार होता की तो सहज दरीत पडेल, यावर आमचा विश्वासच बसत नाही. त्या ठिकाणी रेलिंग आणि कठडे आहेत. तो अपघात असूच शकत नाही,” असे म्हणत त्यांनी थेट खुनाचा आरोप केला.

“त्या मुलीचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध होते. ती त्याच्यासोबत उदयपूर येथे फिरायलाही गेली होती. तिचे अनेक आक्षेपार्ह चॅट्सही समोर आले आहेत. माझ्या मुलाचा खून झाला आहे. मला फक्त न्याय हवा आहे,” असे म्हणताना विशाल अग्रवाल यांना अश्रू अनावर झाले.

पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधितांच्या हालचालींचा तपशील तपासण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, तपास अधिक वेगाने पुढे जात आहे.

काही दिवसांतच जयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात होणाऱ्या विवाहाची स्वप्ने पाहणाऱ्या अग्रवाल कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका तरुण उद्योजकाचा मृत्यू, त्यामागील संशयित प्रेमसंबंध आणि कुटुंबीयांचे आरोप यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT