Pune Lok Sabha Election 2024 Sarkarnama
पुणे

Pune Lok Sabha Election 2024 : धंगेकर, मोहन जोशी, अरविंद शिंदेंच्या वाटेत आबा बागुलांनी टाकले काटे...

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभा निवडणूक आता अगदी उंबरठ्यावर असतानादेखील संकटकाळात जात असलेल्या पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटताना दिसत नाही. परिणामी पुणे लोकसभेला कोण उमेदवार असणार? याचा तिढा सुटण्याऐवजी आणखी गुंतत चालला आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी एक लेटर बॉम्ब टाकून नव्या वादांना तोंड फोडले आहे. (Pune Political News)

आबा बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घेऊनच पुणे लोकसभेचा उमेदवार ठरवण्यात यावा, अशी विनंती केली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वाद नित्याचेच झाले असताना आता बागुल यांच्या पत्रामुळे काँग्रेसमधील वाद-विवाद आणखीनच वाढले आहेत. यामुळे पुढील काळात पुणे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून हेवेदाव्यांचा भडका उडण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लोकसभेच्या उमेदवारीवरून पुणे काँग्रेसमध्ये खल सुरू आहेत. प्रदेश काँग्रेसकडून पुण्यातील इच्छुकांची यादीदेखील मागून घेण्यात आली आहे. यामध्ये आजी-माजी आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश असलेली 20 जणांची यादी प्रदेश काँग्रेसला पाठवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसकडून इच्छुक असणाऱ्या नेत्यांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आल्याचे पाहायला मिळालं.

मात्र, या काळामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले आबा बागुल मात्र या सर्व प्रक्रियेपासून दूरच असल्याचे पाहायला मिळाले. बहुतांश बैठकींना त्यांनी उपस्थितीदेखील लावली नव्हती. आणि आता पुढील काही दिवसांत उमेदवारी जाहीर होणार असतानाच आबा बागुल यांनी लेटरबॉम्बचे हत्यार उपसले आहे. या लेटरबॉम्बमुळे पुणे काँग्रेसमधील चलबिचल वाढून अंतर्गत वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आबा बागुल हे सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. असे असतानादेखील काँग्रेसने त्यांना मोठी संधी दिली नाही, अशी आबा बागुल यांची नाराजी आहे. त्यांची ही नाराजी वारंवार दिसून आली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आबा बागुल हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत होत्या. तसेच आबा बागुल यांचे पुत्रदेखील भाजपवासी होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचं सांगण्यात येत आहे. असं असले तरी सध्या आबा बागुल यांचे काँग्रेसमध्ये एक ज्येष्ठ नेता म्हणून स्थान आहे. त्यामुळे त्यांच्या लेटरला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं बोललं जातंय.

जर आबांचं म्हणणं प्रदेश काँग्रेसने मनावरती घेतलं तर ते कोणत्या इच्छुकाच्या पथ्यावरती पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण काही काळापासून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार अशा अविर्भावात आहेत, तर दुसरीकडे मोहन जोशी यांचे दिल्लीतून तिकीट आणण्याची खासियत आहे. तिसरीकडे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हेदेखील तिकीट आणण्यासाठी फिल्डिंग लावून आहेत. त्यामुळे आबा बागुल यांनी या लेटरच्या माध्यमातून इच्छुकांच्या वाटेत काटे पेरलेत का? अशी चर्चासुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आबा बागुलांच्या पत्रात काय ?

जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, मगच पुणे लोकसभेसाठी उमेदवाराचा निर्णय घ्यावा. लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यास अजून अवधी आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा आहे. आज जरी तो भाजपच्या ताब्यात असला तरी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेणे सहजशक्य आहे. त्यासाठी पुणेकरांच्या मनात कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी मी जाहीर सभा घेतो. या सभेला हजारोच्या संख्येने पुणेकर नागरिक उपस्थित राहतील.

पुणेकर मतदार सूज्ञ आहेत. ते जो कौल देतील, त्यानुसार पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. तुम्ही फक्त या सभेत मार्गदर्शन करा आणि पुणेकरांचा कौल कुणाला आहे हे जाणून घेऊनच लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. मी गेली 40 वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाचे कार्य करीत आहे. तब्बल ३० वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय आहे. प्रभागच काय वॉर्ड रचना बदलूनही सलग सहा वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहे. शहर विकासाचे व्हिजन आणि काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे याची मला सदैव जाण असल्यानेच जनतेनेही भरभरून मतदान केलेले आहे. त्यामुळेच सहा टर्म लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांनी स्वीकारले आहे आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ यावर जनमानसातूनच शिक्कामोर्तब झाले आहे.

मला समाजकारण -राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. मी खात्रीपूर्वक नमूद करतो की, यंदा पुणे लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. त्यासाठी जनमताचा कौल घ्या, जाहीर सभा घेण्यास मला निर्देश द्या, मी सक्षम व तयारीत आहे. तसे झाल्यास पुणेकरांचा कौलही कळेल आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची वातावरण निर्मितीही होईल. कृपया आपण आता गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती. आणि त्यानुसारच 'कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा' हे सूत्र लोकसभेसाठी यंदा अवलंबावा ही विनंती.

जर तेच ते 'यशस्वी कलाकार' ( मोठ्या मताधिक्याने पराभूत झालेले) पुन्हा लोकसभेसाठी दिल्यास निकालही नेहमीप्रमाणे 'यशस्वी'च लागेल. हेच कलाकार आपल्यापुढे वेगळे चित्र निर्माण करतात आणि नंतर जबाबदारीही पेलत नाहीत, घेत नाहीत आणि पराभव झाल्यानंतर मौनव्रतात जातात. परिणामी सर्वांचेच श्रम वाया जातात. गेली अनेक वर्षे शहरात याच मंडळींना जनमताचा कौल मिळाला नाही व मतदारांमध्ये परिवर्तनही करता आले नाही हेच चित्र आहे.

त्यामुळे आता गांभीर्याने विचार करून काँग्रेस पक्ष (Congress Party) पर्यायाने राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी, राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गे आणि आपण स्वतः यांचे हात बळकट करण्यासाठी 'कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा' हे सूत्र यंदा अवलंबून जाहीर सभेतून पुणेकरांकडून मिळणाऱ्या कौलानुसार उमेदवार ठरवावा ही पुनश्च विनंती, असे म्हणणे आबांनी पत्रातून मांडले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT