Pune Metro News: बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिथल्या मतदारांना खूश करण्यासाठी पुण्याची मेट्रो बिहारला पळवण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी पाटणा मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने राजकीय दबावापोटी पुण्यासाठी राखीव असलेली आख्खी एक मेट्रो ट्रेन तीन वर्षांच्या भाडेकरारावर बिहारला दिल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. ही मेट्रो ट्रेन तात्काळ पुण्यात परत आणली नाही तर महामेट्रो कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी पुणे मेट्रो अधिक सक्षम व विस्तारित करण्याची गरज आहे. सध्या दररोज सरासरी १.८० लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत. गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यासह प्लॅटफॉर्मवरील गर्दी आणि नव्याने सुरु होणाऱ्या मेट्रो मार्गिका यासाठी राखीव रेल्वेची उपलब्धता असणं गरजेचं आहे, असं असताना पाटणा मेट्रोला ट्रायलसाठी सध्या स्वतःची मेट्रो ट्रेन उपलब्ध नसल्यानं पुण्याची ट्रेन तिकडे पाठवण्यात आली आहे, असा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
तसंच हा निर्णय घेताना पुण्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री किंवा नागरी प्रतिनिधीना विश्वासात घेतले का? हा प्रश्न आहे. तसेच भाडेकराराच्या अटी नेमक्या काय आहेत? पुण्यासाठी नवीन ट्रेन संच कधी येणार आहे? आणि बिहारला दिलेली मेट्रो ट्रेन परत येणार आहे का? याबाबत आम्हाला शंका आहे" असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.
पुणे मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या ३४ मेट्रो ट्रेन संचांपैकी एक राखीव संच (तीन डब्यांची मेट्रो ट्रेन) महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने पाटणा मेट्रो प्रकल्पासाठी भाडेतत्वावर देण्यात आली असून ती पाटणाला रवाना केली आहे. ही ट्रेन आता बिहारमधील गीतागड येथील डेपोत असून आता फक्त ३३ संच पुणे महामेट्रोकडे उपलब्ध आहेत. त्यामुळं इथं मेट्रो ट्रेनची गरज असताना बिहारला मेट्रो ट्रेन पाठवणं अयोग्य आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुण्याच्या विकासावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. ही मेट्रो बिहार निवडणुकीपूर्वी सुरू होणाऱ्या मेट्रोसेवेचे श्रेय घेण्यासाठी पळवण्यात आली आहे," असा आरोपही युवक काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. पुण्याची मेट्रो सेवा अजून अपूर्ण आहे. याची प्रवासी संख्या वाढत आहे. नवीन मार्ग सुरू होणार आहेत. अशावेळी ही मेट्रो बिहारला पाठवणे म्हणजे पुण्याच्या विकासाला मागे टाकणे आणि बिहारसारख्या राज्याच्या राजकीय अजेंड्यासाठी महाराष्ट्राच्या लोकसेवेला दुय्यम स्थान देण्यासारखे आहे, असं युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.