Abhinav Deshmukh
Abhinav Deshmukh sarkarnama
पुणे

पुणे ग्रामीण पोलिसांनीही अनुभवला `जय भीम`

Amol Jaybhaye

पुणे : देशभरात सध्या चर्चेचा विषय ठरलेला 'जय भीम' (Jai Bhim) या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने हा चित्रपट पाहावा, असे एकमेकांना सुचविले जात आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनाही हा चित्रपट पाहावासा वाटला. त्यांनी तो एकट्याने न पाहता आपल्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण टीमसोबत तो पाहिला.

पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा विषय या चित्रपटात असल्याने पोलिसांविषयीची नकारात्मक छटा यात आहे. तरीही तो पोलिसांना पाहावा, असाच चित्रपट असल्याने देशमुख यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

पुणे ग्रामीण पोलिस दलातील सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक यांच्यासोबत गुन्हे आढावा बैठकीमध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला. त्याबद्दल देशमुख यांनी एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे.

ते या पोस्टमध्ये म्हणतात, `जय भीम," पुणे ग्रामीण पोलिस दलातील सर्व स्टेशन प्रभारी अधिकारी आणि उपअधीक्षक यांच्यासोबत गुन्हे आढावा बैठकीमध्ये 'जय भीम' चित्रपट पाहिला. यामध्ये अतिशय प्रभावीपणे, तामिळनाडूमध्ये 1995 मध्ये झालेल्या एका उच्च न्यायालयातील खटल्याची गोष्ट मांडण्यात आली आहे. स्वतःच्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारी सेंगणी, तिची बाजू कोर्टासमोर प्रभावीपणे मांडून तिला न्याय मिळवून देणारे वकील चांद्रू आणि सर्व दबाव झुगारून निपक्षपातीपणे तपास करून सत्य न्यायालयासमोर ठेवणारे पोलीस अधिकारी पेरीमल स्वामी या कथेतील प्रमुख नायक आहेत. मात्र, कथेचा आत्मा बाबासाहेबांनी दिलेली भारतीय राज्यघटना, तिने प्रत्येक भारतीयाला, विशेषतः समाजातील दुर्बल, वंचित घटकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार प्रत्यक्षात अमलात येण्यासाठी, व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याची क्षमता आणि प्रेरणादेखील बाबासाहेबांच्या विचाराने नायकामध्ये निर्माण झाली आहे. पोलिस कोठडीमधील अत्याचार, पोलीस तपासामध्ये वैज्ञानिक पद्धतींचा वापराचा अभाव, गुन्हेगारी जमात हा ब्रिटिश काळातील शिक्का मिटवण्याची आवश्यकता, अजूनही अस्तित्वात असणारी जातीय विषमता असे अनेक विषय हा चित्रपट अतिशय प्रभावीपणे अधोरेखित करतो.``

अतिशय अंतर्मुख करणारा अनुभव या चित्रपटाने दिला. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा नायक वर्तमानपत्र वाचण्यासाठी हातात घेतो, तेव्हा निरक्षर आणि आदिवासी संगिनीची सहा वर्षाची पोर देखील त्याच ऐटीत वर्तमानपत्र हातात घेते, तो क्षण भविष्याविषयी नवी आशा आणि उमेद जागवणारा आहे. सर्वांनी पाहावाच असा हा चित्रपट असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांना हा चित्रपट कसा वाटला, याबाबत बोलताना देशमुख म्हणाले की त्यांनाही तो आवडला. 25 वर्षांपूर्वी घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. तेव्हाची पोलिसांची प्रतिमा आणि आताची प्रतिमा यात फरक पडलेला आहे. समाजाकडून पोलिसांच्या दुहेरी अपेक्षा असतात. गुन्ह्यांचा तपासही लवकर व्हावा, असे समाजाला वाटत असते. त्यामुळे पोलिसांकडून अनेकदा चुका घडतात. आरोपीला बोलते करण्यासाठी `थर्ड डिग्री`चा वापर आधी केला जात असल्याच्या घटना घडत होत्या. पण आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करण्याची गरज आहे. समाजही सजग आणि जागृत झाला आहे. कायद्याच्या कसोटीवर टिकणारा शास्त्रीय तपासच यापुढे गरजेचा असल्याचा संदेश या चित्रपटातून पोलिसांनाही मिळतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT