Swabhimani Shetkari Sanghatana News Sarkarnama
पुणे

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटना बारामतीतून करणार नवा राजकीय एल्गार!

सरकारनामा ब्यूरो

-सागर आव्हाड

Swabhimani Shetkari Sanghatana Baramati Meeting : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक रविवारी स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन संपन्न झाली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर संपन्न झालेल्या या पहिल्याच बैठकीत लोकसभेतील पराभवाच्या कारणांवर चर्चा झाली.

तसेच भविष्यकालीन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलनाची व राजकीय भूमिका काय असणार यावर विचार मंथन करण्यासाठी 22 व 23 जूनला बारामतीत राज्य कार्यकारिणीची व्यापक बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

गेली 25 वर्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत संघर्ष करत आली आहे. राजू शेट्टींनी केलेल्या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऊस दरामध्ये मोठा फायदा झाला. म्हणून हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांनी राजू शेट्टींना दोन वेळेस खासदार केले. परंतु याच शेतकऱ्यांनी राजू शेट्टींचा दोनदा सलग पराभव देखील केला.

'स्वाभिमानी शेतकरी संघटना आज प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी लढत असताना, या निवडणुकीत राजू शेट्टींसह राज्यात स्वाभिमानीच्या उभ्या असणाऱ्या उमेदवारांना पराभव का बघावा लागला. आंदोलनात प्रचंड संख्येने शेतकरी सहभागी होतात. स्वाभिमानीमुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतात. मग तेच सर्वसामान्य नागरिक मतदानाच्या वेळेस स्वाभिमानीला का बाजूला ठेवतात? यावर व्यापक चर्चा व्हावी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जनमताचा कौल लक्षात घेऊन नवी राजकीय भूमिका घ्यावी. यावर विचारमंथन करण्यासाठी बारामती येथे 22 व 23 जूनला दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होणार आहे.' असे संदीप जगताप यांनी म्हटले आहे.

तसेच, 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या लोकसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र चालण्याची भूमिका होती. कुठल्याही आघाडीत न जाता देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चार ते पाच लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद दिसून आली. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे तिथले निकाल अनपेक्षित लागले. संपूर्ण राज्याचा विचार केला तर किमान 40 विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निर्णायक मतदार आहे.'

याशिवाय 'स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्याच्या बाजूने उभे राहील ती आघाडी तिथं विजयी होऊ शकते. स्वाभिमानीने विरोध केल्यास तिथे निवडून येणे अवघड आहे. ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कोल्हापूर जिल्ह्याने मागील विधानसभा निवडणुकीत अनुभवली आहे. स्वाभिमानी विरोधात असल्यामुळे एकही आमदार कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा निवडला नाही. यामुळे लोकसभेतला पराभव झाला असला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कमी झाली, असे म्हणता येणार नाही. यामुळे बारामतीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा काय एल्गार करते .याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.' असंही म्हटलं आहे.

याचबरोबर, 'लोकसभेत राजू शेट्टींच्या पराभवांने आम्ही दुःखी झालो असलो तरी स्वाभिमानीचे मावळे खचलेले नाही. संपूर्ण राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निर्णायक अशी ताकद आहे. किमान 40 विधानसभा मतदारसंघात आम्ही निर्णायक आहोत. राजू शेट्टी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्यांनी केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनांबद्दल जनतेमध्ये प्रचंड आदर आहे.

यामुळे बारामतीत होणाऱ्या राज्य कार्यकारिणीत आम्ही सखोल विचारमंथन करून नव्या जोमाने विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहोत. मला खात्री आहे येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत किमान 15 आमदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभेत दिसतील. असं ही सांगतिलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT