Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar On Ajit Pawar :''शरद पवारांबाबत असं वक्तव्य होऊनही, जर अजितदादांसारखे नेते शांत बसत असतील, तर...''

Mayur Ratnaparkhe

Rohti Pawar News : ''आम्ही शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहोत. मात्र, काही लोकांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नावाने केवळ आणि केवळ राजकारण केलं,'' असं म्हणत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील सभेत शरद पवारांच्या नावाचा उल्लेख न करत त्यांच्यावर टीका केली.

विशेष म्हणजे या प्रसंगी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थितीही होती. त्यामुळे मोदींनी केलेल्या टीकेवरून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. शिवाय उलटसुलट प्रतिक्रियाही उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

युवा संघर्ष यात्रेदरम्यान एका वृत्तवाहिनीला बोलताना रोहित पवार म्हणाले,''अजितदादांनी खरं तर तिथे बोलायला पाहिजे होतं. मराठी माणूस हा जागेवर उत्तर देणारा व्यक्ती असतो. अजितदादांनी जेव्हा पूर्वी भाषणं केलेली आहेत, तेव्हा पवारांचे गुणगाण त्यांनी गायलेलं आहे. हे जे नेते तिकडे गेले आहेत, त्याही पवारांचे गुणगाण गायलेलं आहे, पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि हे शेतकऱ्यांनाही माहीत आहे. अशा परिस्थितीत तिथे असं वक्तव्य होऊन, जर अजित पवारांसारखे नेते शांत बसत असतील, तर ते कुठंतरी आम्हालाही अवघड वाटतं, योग्य वाटत नाही.''

याचबरोबर ''कांदा उत्पादक, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना, दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना विचारा की आताचं सरकार त्यांच्याबद्दल काय करत आहे. शेतकऱ्यांना तुम्ही विचारा की आजच्या सरकारने काय केलं आणि शरद पवारांनी काय केलं? तुम्हाला उत्तर तिथे मिळून जाईल,'' असंही रोहित पवारांनी सांगितलं.

याशिवाय ''मोदी जेव्हा बारामतीला आले होते, तेव्हा एक वक्तव्य त्यांनी केलं होतं, की शरद पवारांचं कृषिविषयक ज्ञान खूप आहे. त्यांचे कष्ट खूप मोठे आहेत. त्यांच्या हाताला धरून आपण राजकारण शिकलेलो आहोत, असं मोदी बोलले आहेत; मग मोदींनीच स्पष्ट करावं की ते आता खोटं बोलताहेतकी तेव्हा खोटं बोलले होते.''

''त्यांना स्पष्टीकरण मागायला आम्ही फार छोटे आहोत, परंतु जेव्हा एखाद्या शासकीय कार्यक्रमात राजकीय बोललं जातं, विशेष करून शरद पवारांबाबत बोललं जातं, तेव्हा कुठंतरी मराठी अस्मिता ही जागवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो.

मराठी अस्मिता जेव्हा जागवली जाते, तेव्हा आम्हालाही हेच वाटतं की, महाराष्ट्राचे मोठे उद्योग गुजरातला नेले गेले. आता मुंबईतून हिऱ्याचा व्यापारही गुजरातला चालला आहे. त्यामुळे हे भाजपाचे नेते हे महाराष्ट्राच्या मुलांसाठी, युवकांसाठी काम करतात की गुजरातच्या युवकांसाठी काम करतात हे कुठंतरी स्पष्ट करावं,'' असंही रोहित पवारांनी या वेळी बोलून दाखवलं.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT