MLA Ram Satpute
MLA Ram Satpute Sarkarnama
पुणे

रोहितजी...हर्बल तंबाखूच्या नावाने गांजाची वकिली करणारे मंत्री तुमच्याच पक्षात

umesh ghongade

पुणे : गांजा सेवन करताना पकडलेल्या लोकांकडे गांजा नव्हे तर हर्बल तंबाखू असल्याची वकीली करणारे मंत्री तुमच्या पक्षात आहेत.स्वतःचा जीव धोक्यात घालून ड्रग माफियांच्या मुसक्या आवळणाऱ्या एनसीबीच्या आधिकाऱ्यांविषयी रोज पत्रकार परिषदा घेऊन गरळ ओकली जाते हेच आहे का तुमच्या साहेबांचे ड्रग माफियांना सुरक्षा पुरविण्याचे धोरण, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारला आहे.

आमदार सातपुते यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्यातील आघाडी सरकार व रोहित पवार यांच्यावर टीका करीत धाडस असेल तर समोरासमोर चर्चा करा, असे आव्हान रोहित पवार यांना दिले आहे. फेसबुकवरील पोस्टमध्ये आमदार सातपुते म्हणतात, ‘‘ आज काल महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना केंद्र सरकारच्या विरोधात फोबिया नावाचा आजार जरा जास्तच होतो आहे.या रोगाची लक्षणे अतिशय सामान्य आहेत आणि विशेषतः महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये ती प्रामुख्याने आढळून येतात.’’

मंत्र्यांची वसुली जोरात सुरु असली की राज्यात भरभराट आली आणि त्यावर कारवाईचा बडगा उगारला की मात्र देशाच संविधान धोक्यात आलं अशी तुम्ही ओरड करता.वसुलीचे सॉफ्टवेअर हे खास वसुलीसाठी मंत्रीच बनवतात रोहित पवार त्याकडे पण जरा लक्ष द्या, असे आमदार सातपुते यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

ड्रग माफियांची सुपारी घेऊन १० ग्राम गांजा सापडला तर कारवाई करू नका, असे सांगणारा मंत्री आपल्याच राज्यात आहे याचा विसर पडला का ? हर्बल तंबाखू च्या नावाने गांजाची वकिली करणारे मंत्री व नेते देशात फक्त तुमच्या साहेबांच्या राष्ट्र्वादीतच आहेत हे आठवतंय का ? स्वतःचा जीव धोक्यात घालून ड्रग माफियांच्या मुसक्या आवळणाऱ्या ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांविषयी रोज पत्रकार परिषदा घेऊन गरळ ओकली जाते हेच का साहेबांचे ड्रग माफियांना सुरक्षा पुरविण्याचे धोरण ? असा प्रश्‍न विचारला आहे.

राजकीय पोळी भाजण्यासाठी लखीमपूरच्या शेतकऱ्याबद्दल रोहित पवार तुम्हाला फार कळवळा आलाय पण महाराष्ट्रात कोरोना मध्ये शेतकरी होरपळला असताना तुम्ही सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज तोडली तेव्हा आपण कुठे होता ? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कारखाने बळकावणाऱ्या टोळ्या कोण आहेत हे महाराष्ट्राला माहित आहे .

महाराष्ट्रात कित्येक बलात्कार झालेत,पालघरमध्ये साधूंना ठेचून मारलं तेव्हा आपल्या संवेदना बोथट झाल्या होत्या का ?आज देखील शेतऱ्यांची वीज तोडायचे काम तुमचं सरकार करत आहे त्याबद्दल आपण गप्प का ? महाराष्ट्रातील गोरगरीब कुटुंबातून अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या ‘एमपीएससी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांचं वाटोळं आपल्या सरकारने केलं आहे त्याबद्दल शांत का ? पश्चिम बंगाल मधील भाजपाचा पराभव दिसला पण बंगाल मध्ये हिंदूंच्या कत्तली सुरु आहेत त्याबद्दल कधीतरी बोला, असे आवाहन आमदार सातपुते यांनी केले आहे.

तुमचं सरकार हे वसुली सरकार आहे,ड्रग माफियांना संरक्षण देणारं सरकार आहे, स्त्रियांचं रक्षण न करू शकणारं तुमचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं कर्मदरिद्री सरकार आहे, राज्यातील होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाणी फिरविणारं आणि स्वतःच्या खानदानाचंच हित पाहणार हे तुमचं सरकार आहे,अल्पसंख्यांकांच अति तुष्टीकरण करणारं आणि हिंदुचे मंदिर बंद ठेवणार हे हिंदुविरोधी सरकार आहे, या शब्दात आमदार सातपुते यांनी आमदार पवार यांच्यावर टीका केली आहे.

आमदार पवार या सगळ्या मुद्द्यांवर आपले धाडस असेल तर समोरासमोर चर्चा करा.तुमच्या नेत्यांसारख्याच पोकळ आणि वांझोट्या गप्पा आता बस्स करा, या शब्दात आमदार सातपुते यांनी हल्ला चढविला आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT