loksabha Election Pune Sarkarnama
पुणे

Pune Loksabha Election : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसचे केंद्रीय पथक आल्याची अफवा

Sudesh Mitkar

Pune Election News : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून पुणे लोकसभेसाठीचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. उमेदवार घोषित झाल्यानंतर इतर इच्छुकांमध्ये नाराजीचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. भाजपकडून (BJP) संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी तर काँग्रेसकडून आबा बागुल यांनी नाराज असल्याचे सांगत बंड पुकारले आहे. या बंडोबांना थंड करण्यासाठी विविध पातळ्यांवरती पक्षांकडून काम करण्यात येत आहे. अशातच काँग्रेस हाय कमांडकडून पुण्यातील पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी पथक पाठवण्यात आल्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र, या चर्चा निव्वळ अफवा असल्याचा खुलासा काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arwind Shinde) यांनी केला आहे. त्यामुळे या अफवा नेमकं कोण पसरवतंय हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महायुतीकडून जवळपास डझनभर इच्छुक उमेदवार होते, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसच्या 20 जणांनी इच्छा प्रदर्शित केली होती. असे असले तरी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना लोकसभेची उमेदवारी दिली असून, दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या दोघांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी पाहायला मिळाली आहे. काही नेत्यांनी थेट समोर येत आपली नाराजी व्यक्त करत पक्षाविरोधात बंड पुकारल्याचे पाहायला मिळालं. या बंडोबांना थंड करण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांसह पदाधिकारी कामाला लागले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवरती ही बंडाळी मोडीत काढण्यात कुठेतरी अपयश येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून ही बंडाळी मोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दृष्टिकोनातून रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच भाजपचे नाराज असलेल्या संजय काकडे यांची भेट घेतली.

तर दुसरीकडे काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीची दखल काँग्रेसच्या (Congress) केंद्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे. त्यासाठी विशेष निरीक्षक पथक पुण्यात पाठवले आहे. या पथकाकडून काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी कोणकोणत्या घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, याची माहिती संकलित केली जाणार असून, ती केंद्रीय पातळीवर पाठवली जाणार आहे. त्यानंतर केंद्रीय पातळीवरच्या सूचनांनुसार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे.

तसेच पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील नाराजी दूर करणे, उत्तर भारतीय मतदारांना पुण्यात रोखून ठेवणे आणि 13 मे रोजी उत्तर भारतीय मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याचे काम हे पथक करणार असल्याबाबतच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या आहेत. मात्र, या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितलं, की काँग्रेसचे पथक जर पुण्यात आलं असतं तर त्याची माहिती सर्वप्रथम काँग्रेस मुख्यालयात समजलr असती. काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी त्या पथकाने संपर्क साधला असता. अशा प्रकारचा कोणताही संपर्क आमच्याशी झालेला नाही. काँग्रेसकडून असे कोणतेही पथक पाठवण्यात येईल, याची शक्यता नाही. त्यामुळे पथकाची बातमी या निव्वळ अफवा असून, पक्षांतर्गत काही लोक अशा प्रकारचा खोडसाळपणा करत असल्याचा निर्वाळा शिंदे यांनी केला आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT