Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : सत्यपाल मलिकांचा गौप्यस्फोट; पुलवामावरून शरद पवारांचा केंद्रावर गंभीर आरोप, म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar on Central Govt : जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत काही गौप्यस्फोट केले आहेत. मलिक यांच्या वक्तव्यानंतर केंद्र सरकारवर विरोधक टीका करू लागले आहेत. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मलिकांच्या खुलाशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला आहे. ते पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

२०१९ लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पुलवामा (Pulwama) घटना घडली होती. त्यात 'सीआरएफ'च्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता. या घटनेला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे स्पष्ट मत जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले की, "पुलवामामध्ये 'सीआरएफ'च्या जवानांनी पाच विमानाची मागणी केली होती. ती मागणी गृह मंत्रालयाने मान्य केली नाही. त्यामुळे जवानांना धोका असतानाही भूमार्गाने यावे लागले. ही चूक केल्याने ४० जवानांना जीव गमवावा लागला आहे. पुलवामा घटनेनंतर पंतप्रधान मोदी (Narendra Modi), अजित डोवाल यांना माहिती दिली. त्यांनी मात्र याबाबत गप्प राहण्यास सांगितले." या हल्ल्याचा आरोप आपोपाच पाकिस्तानकडे जाणार होता. याचा फायदा निवडणुकीत होईल, असे सरकारचे धोरण असल्याचाही गौप्यस्फोट मलिक यांनी केला.

सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर केंद्र सरकारवर विरोधकांनी धारेवर धरले आहे. याबाबत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "देशात अनेक गोष्टी घडल्या तरी खऱ्या अर्थाने त्यांची वस्तूस्थिती देशासमोर मांडली गेलेली नाही. २०१९ मध्ये पुलवामा भागात ४० जवान शहीद झाले. यामागची गोष्ट जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी समोर आणली आहे. मलिक यांची राज्यपालपदी नियुक्ती भाजपकडून करण्यात आली होती. त्यावेळी जवानांना आवश्यक साधने, विमाने वेळीच पुरवली गेली नसल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागल्याचे सांगितले."

या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असा घणाघातही यावेळी पवार यांनी केला. ते म्हणाले, "पुलवामा घटनेबाबत मलिक यांनी देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींना माहिती दिली. त्यावर संबंधितांनी उपाययोजना न करता त्यांना घटनेबाबत कुठेही वाच्यता करू नये, असे सांगण्यात आले. देशाच्या जवानांचे रक्षण करण्याची जबाबदारी देशाच्या सरकारवर आहे. ती सुद्धा पार पाडायची नाही. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. त्यासाठी पुढील निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT