Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar Bhor : कट्टर विरोधक थोपटेंच्या साक्षीनेच पवारांनी केला पहिला उमेदवार जाहीर...

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : संसदेत 98 टक्के उपस्थिती, तब्बल सातवेळा संसदरत्न पुरस्कार विजेत्या, आपल्या कामाच्याबाबत सतत पहिल्या तीनमध्ये असणारा उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत असेल, असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंची बारामतीतून उमेदवारी जाहीर केली. तत्पुर्वी पवारांनी त्यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटेंची भेट घेतली. त्यानंतर थोपटेंच्या उपस्थितीतच झालेल्या जाहीर सभेत सुळेंची उमेदवारी जाहीर केली. (Latest Political News)

भोरमधील हरिश्चंद्री येथे महासभा एकनिष्ठेची! महाविकास आघाडीचा भव्य शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), आमदार संग्राम थोपटे आदी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुळें यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यापूर्वी 2009 पासून सलग तीन वेळा खासदार म्हणून सुळे निवडून आलेल्या आहेत. आता त्यांची ही चौथी टर्म असणार आहे.

शरद पवारांनी (Sharad Pawar) यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. पवार म्हणाले, देशाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. यापूर्वी अनेकांनी देशाचे नेतृत्व केले. मात्र गेली दहा वर्षे या देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे विपरीत परिणाम दिसत आहेत. कृषीमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर माझ्यासमोर देशात एक महिना पुरेल एवढाचा अन्नधान्याचा साठा असल्याची फाईल आली. त्यानंतर परदेशातील धान्य आयात करणे बंद करून आपले उत्पादन वाढीवर लक्ष दिले. शेतकरी आत्महत्या करतात, हे लक्षात आल्यानंतर कर्जमाफी केली. मोदींना मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा घणाघात पवारांनी केला.

पंतप्रधान देशाचा असतो कुठल्या एका राज्याचा नसतो. गेल्या दहा वर्षांतील निकाल, निर्णय पाहिले तर पंतप्रधान मोदींचे (Narendra Modi) लक्ष फक्त गुजरातवरच असल्याचे दिसते. बाकीचे राज्य संकटात टाकायची, तेथील साधन संपत्तीवर गुजरातला समृद्ध करायचे, असेच सुरू आहे. याचा अर्थ ते देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यांना देशाचा विचार समजत नसेल तर त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून पराभव करणे गरजेचे आहे, असे आवाहनही पवारांनी केले.

पवारांनी पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीचा समाचार घेतला. मोदींनी सांगितले होते परदेशात काळा पैसा आहे तो आणून शेतकऱ्यांच्या खिशात टाकेल. यावर ते बोलत नाहीत. गेल्या दोन वर्षांत दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी वर्षभर विचार केला नाही. त्यामुळे त्यांच्या गॅरंटीवर विचार करावा लागतो. युवकांना बेरोजगार करुन एक कुटुंब संकटात ढकलण्याचे काम मोदी करतात. सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते. मात्र आज लोकांना त्रास देण्यासाठीच सत्तेचा वापर होताना दिसत आहे. सत्तेचा गैरवापर कसा करावा, याचा आदर्शच या सरकारने घालून दिला आहे. त्यांच्या या स्वैराचाराला आवर घालण्यासाठीच ही निवडणूक महत्त्वाची आहे, अशी टीका पवारांनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT