Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama
पुणे

राजीव गांधींनी माझ्याविरोधात सभा घेतली.. तरी मी जिंकलो : पवार रमले जुन्या आठवणीत!

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हत्येनंतर काँग्रेसला (Congress) सहानुभूतीची लाट होती, त्यावेळी राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी येथे माझ्याविरोधात सभाही घेतली होती. मात्र, या भागातील नागरिकांनी मला निवडून दिले आणि लोकसभेत पाठवले. त्यावेळी देशात एक नंबरची मते राजीव गांधींना होती, तर, दुसऱ्या क्रमांकाची मला होती. आता जी ज्येष्ठ मंडळी येथे दिसत आहेत. ते त्यावेळी तरुण कार्यकर्ते होते. त्यांनी यासाठी मेहनत घेतली होती, अश्या जुन्या आठवणींना राष्ट्रवादी कॅाग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उजाळा दिला.

शरद पवार म्हणाले, मी या शहरात बऱ्याच दिवसांनी आलो आहे. माझ्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातमध्ये अजित पवारांनी लक्ष दिले. कोरोना संकटात एक वर्ष निघून गेले आहे. मात्र, आता पुन्हा एकदा शहराला विकासाच्या वाटेवर दाखवायचे आहे. त्या दृष्टीने आपले सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो असे ते म्हणाले. ते पिंपरी-चिंचवड मध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून 1985 मध्ये लोकसभेत गेले होते. तेव्हा ते समाजवादी काॅंग्रेसकडून उभे होते. ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते. तेव्हाच्या बारामती लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड परिसराचा समावेश होता. तेव्हा त्यांच्या विरोधात काॅंग्रेसकडून शंकरराव बाजीराव पाटील यांनी निवडणूक लढवली होती. पवार यांचे चरखा चिन्ह होते तर पाटील यांचे चिन्ह हाताचा पंजा हे होते. पाटील यांच्यासाठी राजीव गांधी यांनी सभा घेतली होती. राज्यात 1985 च्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसची लाट होती. या निवडणुकीत काॅंग्रेसने राज्यात लोकसभेच्या 48 पैकी 43 जागा जिंकल्या होत्या. बारामती (शरद पवार), औरंगाबाद (साहेबराव डोणगावकार पाटील), राजापूर (मधू दंडवते), मालेगाव आणि मुंबईतील एका मतदारसंघातून दत्ता सामंत हे पाच जण बिगरकाॅंग्रेसचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले होते.

पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदे बोलताना पवारांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. या सरकारला सामान्य लोकांच्या प्रश्नांसंबधी आस्था नाही. असे कधीच घडले नव्हते. केंद्र सरकार कडून वारंवार सांगण्यात येतय की, आंतराराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीचा हा परिणाम आहे. पण मला आठवते की, साधारण सहा महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती एकदम खाली आल्या व जगभरातील पेट्रोल निर्माण करणाऱ्या देशांच्या किंमतींमध्ये घसरण होत असताना, इथे मात्र किंमती वाढत राहिल्या. मात्र, केंद्र सरकारने पेट्रोलच्या किंमती कमी केल्या नाही, अशी टीका पवार यांनी केली.

पवार म्हणाले, मनमोहन सिंग यांचे सरकार होते, त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किंमती वाढल्या, म्हणून आम्हाला किंमती वाढवायचा निर्णय घ्यावा लागला. मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर दहा दिवस सलग संसदेत कामकाज चालू न देण्याची भूमिका, ही भाजपने त्यावेळी घेतली होती. आज स्वतःचा पक्ष सत्तेवर असताना दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवल्या जात असून सामान्य माणसाला महागाईच्या संकटात ढकलण्याच काम केले जात असल्याचा आरोप पवार यांनी केंद्र सरकारवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT