Sharad Pawar | Jayant Patil Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : 'शेकाप'च्या जयंत पाटलांचा पराभव कसा झाला? नेमकं कुठं चुकलं? शरद पवारांनी गणित मांडलं

Akshay Sabale

Maharashtra Political News : विधानसभेत संख्याबळ नसतानाही विधान परिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा शेतकरी कामगार पक्षाचे नेते, जयंत पाटील करून दाखवायचे. अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार) जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता.

पण, शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडीकडे दोन उमेदवार निवडून येतील, एवढंच संख्याबळ असताना ऐनवेळी शिवसेनेनं ( ठाकरे गट ) मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar ) यांना मैदानात उतरवलं. त्यामुळे बिनविरोध होणार निवडणूक अटीतटीची झाली. महायुतीचे 9 उमेदवार निवडून आले.

तर, महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर यांचाही विजय झाला. पण, जयंत पाटील यांना अवघे 12 मते पडल्यानं त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ठाकरे गटानं उमेदवार उभे केल्यानं पराभव झाल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता.

पण, या निवडणुकीत नेमकं कुठं चुकलं? जयंत पाटलांचा पराभव कसा झाला? यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच, कुणी कुणाला फसवलं नाही, असं ही शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवार म्हणाले, "विधान परिषद निवडणुकीत मला रस नव्हता. कारण, राष्ट्रवादीकडे फक्त 12 मते होती. शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीत पाठिंबा द्यावा, असं वाटलं. कारण, लोकसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणून एकत्र लढलो. एकत्र लढताना डाव्यांमधील सीपीआय, सीपीएम, शेतकरी कामगार पक्षाने आमच्याकडे काही जागा मागितल्या होत्या. पण, त्या जागा देण्याचा स्थितीत आम्ही नव्हतो. येणाऱ्या विधान परिषद किंवा विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला संधी देऊ, असं मित्र पक्षांना सांगितलं. ते सर्व पक्षांनी मान्य केलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश मिळालं."

"विधान परिषद निवडणुकीत आमच्या पक्षाकडे 12 मते आम्ही 'शेकाप'ला देऊ इच्छितो, हे मित्रपक्षांना कळवलं होतं. त्याचवेळेला काँग्रेस आणि शिवसेनेनं उमेदवार उभा केला. पण, विधान परिषद निवडणुकीतील 'स्ट्रॅटर्जी'त ( डावपेच ) मतभिन्नता होती," असं शरद पवारांनी म्हटलं.

"माझं व्यक्तिगत मत वेगळं होतं. काँग्रेसकडे 37, राष्ट्रवादीकडे 12, ठाकरे गटाकडे 16 मते होती. परंतु, माझं गणित वेगळं होतं. काँग्रेसनं एक नंबरचं मत कुणालाही द्यायचं नाही. निवडून येण्यासाठी 23 मते हवी होती. काँग्रेसकडील 37 मते सगळीच त्यांच्याच उमेदवाराला द्यायला हवी होती. दोन नंबरची मते विभागून 50 टक्के शेकाप आणि 50 टक्के शिवसेनेच्या उमेदवाराला द्यायची होती. एक नंबरची मते गरजेपेक्षा जास्त असल्यानं ती 'ट्रान्सफर' होत अधिकची मते दोन नंबरच्या उमेदवारांना मिळतील. दोन नंबरील पहिले मत शिवसेनेला द्यावं. शिवसेनेच्या दोन नंबरने पहिले मत शेकापला द्यावं, अशी 'स्ट्रॅटर्जी' केली असती, तर तीनही उमेदवार निवडून आले असते. हे गणित सगळ्यांना मान्य आहे, असं नाही. पण, असे झालं नसल्यानं जयंत पाटलांचा पराभव झाला. कुणी कुणाला फसवलं नाही," असं शरद पवारांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT