Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पुणे

'एमआयएम' सोबत आघाडी होणार की नाही; पवारांनी स्पष्टच सांगितले

मिलिंद संगई : सरकारनामा

बारामती : कोणी कोणत्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: सांगू शकतात, ज्यांच्यासोबत जायच आहे त्या पक्षाने तरी होकार दिला पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'एमआयएम'ने (Aimim) दिलेला आघाडीचा प्रस्ताव फेटाळला आहे.

बारामतीली गोविंद बाग या निवासस्थानी पत्रकारांशी पवार बोलत होते. पवार म्हणाले, हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नाही. राज्याला या निर्णयाबाबत राष्ट्रीय समितीने स्पष्ट करेपर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भुमिका ते घेवू शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात गेली दोन दिवस एमआयएमबाबत ज्या बातम्या येत आहेत. तो पक्षाचा निर्णय नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

या वेळी पुरंदर विमानतळाबाबत पवार म्हणाले, एक जागा जवळपास निश्चित झालेली आहे. त्याला जवळपास सर्व विभागांनी मान्यता दिली आहे. त्या जागेच्या बाबत संरक्षण खात्याची काही मते आहेत. ती विमानतळाच्या बाबत दुर्लक्षित करता येत नाहीत. त्यामुळे यासंबंधीचा निर्णय घेण्याप्रत आलेली यंत्रणा सध्या थांबली आहे. राज्याच्या दृष्टीने पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न लवकर मार्गी लागावा असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संरक्षणमंत्री आणि संबंधित विभागातील यंत्रणांसोबत राज्य सरकारच्या प्रतिनिधींसह बैठक घेवून निर्णय घ्यावा. हा आग्रह आम्ही दिल्लीत जाऊन करणार आहोत. यापूर्वी एकदा झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली. मात्र, सरंक्षण खात्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याला राज्य सरकारकडून या विभागात काम करणाऱ्या यंत्रणेकडून उत्तर दिले जाईल, असे पवार म्हणाले.

या वेळी पवार यांनी 'काश्मिर फाईल्स' या चित्रपटावरही भाष्य केले. ते म्हणाले, देश एका विचाराने चाललेला आहे. समाजातील सर्व घटक एकत्र आहेत. मात्र, समाजात पुन्हा दुरावा निर्माण होईल असे लिखाण किंवा चित्रपट टाळले पाहिजे. या चित्रपटात कळत नकळत कॉंग्रेसवर एक दोष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॉंग्रेसकडे (congress) सत्ता असताना हे घडले, तेच याला जबाबदार आहेत असे ध्वनित केले जात आहे.

या सर्व बाबींचा आपण सखोल विचार केला पाहिजे. ज्या कालखंडात कश्मीरमध्ये जे काही घडल्याचे दाखवले जात आहे. त्या कालखंडात देशाचे नेतृत्व कॉंग्रेसकडे नव्हते. त्या वेळी विश्वनाथ प्रतापसिंग यांच्याकडे होते. याबाबत आज आवाज उठवणारे भाजपचे (BJP) लोक विश्वनाथ प्रतापसिंगांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले होते. त्यानंतर या सर्व काळात देशाचे गृहमंत्री जे होते तेही भाजपच्या बळावरच होते. तेव्हा काश्मिरमध्ये राज्यपाल राजवट होती.

फारुक अब्दुल्ला सत्तेतून दूर झाले होते. त्यावेळी असणारे राज्यपाल कॉंग्रेसच्या विचारांचे नव्हते. त्यामुळे आज हा प्रश्न उचलून पुन्हा सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या संबध कालखंडामध्ये या सर्वांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करणारे भाजपचे घटक हे पूर्ण सहभागी होते. त्यामुळे त्यांनी आता कारण नसताना हा विषय काढला हे योग्य नसल्याचे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT