Sharad Pawar
Sharad Pawar  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : ''...म्हणून राज्यातील मुलांची लग्न होईना!''; शरद पवारांनी सांगितलं नेमकं कारण

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Latest News : महाराष्ट्रातील उद्योग अन्य राज्यात घेऊन जायचे आणि नवीन उद्योग राज्यात येण्यासाठी सवलती द्यायच्या नाहीत. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. या बेरोजगारीमुळेच राज्यातील अविवाहित मुलांची लग्नं होत नसल्याचं मत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी (ता.४) पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस(Ncp) च्यावतीने महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात जनजागर यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. फौजिया खान, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पुणे शहराध्‍यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार आहे. या दोन्ही सरकारची नीती ही जनतेला महागाईत लोटण्याची आहे. सत्तेत येण्यासाठी मोठी आश्‍वासने दिली. परंतू, ती पाळता येत नसल्यानं, लोकांचं या विषयावरील लक्ष दुसरीकडं वळविण्यासाठी जाणीवपूर्वक जाती-जातींत आणि धर्मा-धर्मांत तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महात्मा जोतिराव फुले यांनी इंग्लंडच्या राजाकडे त्याकाळी भारतातील शेतीत अधिक उत्पादन निघावे या उद्देशाने परदेशातून चांगले बि-बियाणे, दुग्ध उत्पादनासाठी गाई आणि वळूंचे चांगल्या प्रतीचे वाण आणि पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीच मुरविण्याची मागणी केली होती. यावरून महात्मा फुले यांचे विचार किती आधुनिक होते, हे स्पष्ट होते.

मात्र, सध्याचे राज्यकर्त्यांची नीती ही शेतकऱ्यांच्या घामाला किंमत द्यायची नाही. उलट दलालांना संरक्षण देणारे कायदे करायचे आणि त्यांना या कायद्याच्या माध्यमातून संरक्षण द्यायचे आणि सर्वसामान्यांना महागाईत लोटून द्यायचे अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रीय माणूस भीक मागणारा नाहीतर...

राज्य सरकारमधील एका मंत्र्याने राज्यातील काही महापुरुषांनी आणि नेत्यांनी भीक मागून शाळा सुरु केल्याचे नुकतेच वक्तव्य केले होते. परंतु, महाराष्ट्रातील नेते सोडा, साधा सर्वसामान्य माणूससुद्धा कधी भीक मागत नाही. महाराष्ट्रीय माणूस हा श्रम करणारा, घाम गाळणारा आणि घामातून कमावणारा माणूस आहे असा टोलाही शरद पवार यांनी भाजपला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT