Sharad Pawar J P
Sharad Pawar J P  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : "स्वत:च्या राज्यात ज्यांना..." पवारांनी काढला नड्डांना चिमटा!

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar : आगामी २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरली आहे. त्याच अनुषंगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. काल त्यांची सभा चंद्रपूर येथे पार पडली. त्यांनी सभेतून महाराष्ट्रासाठी भाजपचं 'मिशन ४५' असल्याचं सांगितलं होतं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नड्डा यांना चिमटा काढला आहे. भाजपचे अध्यक्ष असताना, पक्ष सत्तेत असताना, केंद्राची सत्ता हाती असताना त्यांच्या स्वत:च्या राज्यामधील निवडणुकीमध्ये यशस्वी होता आले नाही, असा चिमटा पवारांनी काढला.

शरद पवार म्हणाले, "भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे मिशन ४५ नसून ४८ हवं होतं. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत.त्यांनी महाविकास आघाडीवर केलेली टिप्पणी माझ्या वाचनात आली. त्यांच्या राज्यात नुकतीच झालेली निवडणूक त्यांच्या हातात सत्ता होती मात्र लोकांनी त्यांना सत्तेपासून दूर केलं. एका पक्षाचे अध्यक्ष असताना, राज्यामध्ये पक्ष सत्तेत असताना, केंद्राची सत्ता हाती असताना, त्यांच्या स्वत:च्या राज्यामधील निवडणुकीमध्ये यशस्वी होता आलं नाही अशा व्यक्तीने अन्य ठिकाणी जाऊन यशस्वी होण्याची नोंद किती गांभीर्याने घ्यावी, याचा विचार करण्याची आवश्यकता नाही," असा जोरदार टोला पवारांनी लगावला.

"अजित पवार यांचे वक्तव्य पाहिले. संभाजी महाराजांसंबंधी ते लिखाण आहे. माझ्यासमोर दोन प्रकारची लिखाण आली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख व स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन व्यक्तींनी संभाजी महाराजांबद्दल लिहिलेले लिखाण हे कोणाला पसंद पडणारे नाही, परंतु ते कधी काळी लिहिले होते ते कारण नसताना उकरून काढून राज्यामध्ये वातावरण खराब करण्यात अर्थ नाही," असे ही पवार म्हणाले.

"स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर हा प्रश्न आहे, त्यामध्ये ज्या नागरिकांना, घटकाला, व्यक्तीला संभाजी महाराजांबद्दल बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण होत असेल तर त्यासंबंधी उल्लेख करण्यात काहीही चुकीचे नाही. काही घटकांना ते धर्मवीर म्हणून उल्लेख करायचा असेल तर धर्माच्या दृष्टीकोनातून ते बघत असतील तर त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे ते मांडण्याचा अधिकार आहे. संभाजी महाराजांना कोणी धर्मवीर, कोणी स्वराज्यरक्षक म्हणा, याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही," अशी भूमिका पवारांनी घेतली.

"शिवछत्रपती गेल्यानंतर राज्यावर हल्ले होत असताना स्वत:च्या भवितव्याचा विचार न करता, राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी महत्वाचे काम केले त्याची नोंद आपण घेतली तर काही चुकीचे नाही. त्यामुळे यात वाद करण्याचे काही कारण नाही. सध्याचे राज्यकर्ते हे प्राथमिक समस्या ज्या आहेत, ज्यामुळे लोक अस्वस्थ आहेत, असे विषय बाजूला ठेवून त्यापासून लोकांची मत वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करत आहेत," असे पवार म्हणाले.

"मुख्यमंत्र्यांकडे संयुक्त सत्ता आहे. राज्यात लव्ह जिहादसंबंधी कायद्याची मागणीकरिता मोर्चे करण्याची काय गरज आहे. आपल्याकडे सत्ता असताना सत्तारुढ लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन टाकावा. जे करायचे ते करावे याला कोणाचाही विरोध नसेल. कोणत्याही पक्षाला आपल्या कामाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या विस्तार करण्याची भूमिका घेतली याचा आनंद आहे," असेही पवार म्हणाले.

"ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी बांधवांसंबंधी वर्तन करत आहे, ते बघितल्यानंतर मराठी जनतेची मागणी केंद्राने मान्य करावी किंवा सीमाप्रश्न अजूनही कोर्टात प्रलंबित असल्याने कोर्टाचा निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित केलं तरी हरकत नाही. त्यामुळे लोकांना काही प्रमाणात न्याय मिळेल," असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT