Devendra Fadnavis, RSS, Amitesh Kumar
Devendra Fadnavis, RSS, Amitesh Kumar Sarkarnama
पुणे

Pune Police : पुण्याचे पोलिस आयुक्त RSS संबंधित ते फडणवीसांची चमचेगिरी करतात; कुणी केला आरोप?

Sudesh Mitkar

Pune News, 29 June : पुण्यात सातत्याने अंमली पदार्थ सेवनाबाबतची प्रकरणं प्रकर्षाने पुढे येत असल्याने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पुणे (Pune) दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यासह राज्यातील विविध घटनांवर भाष्य केलं. राऊत म्हणाले, "सरकारने लाडकी बहीण ही योजना अर्थसंकल्पात मांडली आहे. जर लाडकी बहीण योजना येऊ शकते तर लाडका भाऊ का नाही?

राज्यातील असंख्य तरुण बेरोजगार आहेत. त्यांच्या हक्काचे रोजगार हे गुजरातला पळवले जात आहेत. पुण्यासारख्या शहरात तरुण ड्रग्सच्या आहारी जात आहेत. अशा भावांसाठी राज्य सरकार काही धोरण तयार करणार आहे का?" असा प्रश्न संजय राऊतांनी (Sanjay Raut) उपस्थित केला. तर, पुणे हे सामाजिक चळवळीचे केंद्रस्थान होते.

मात्र, आता पंजाब नंतर पुणे हे अंमली पदार्थाचे केंद्र बनले आहे. पोलिसांकडून फक्त कारवाईचा दिखावा करण्यात येत आहे. पोलिसांचं पाठबळ, मदत असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यात ड्रग्जचा व्यवसाय सुरू राहू शकत नाही. हे सगळं ड्रग्ज गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे.

अफगाणिस्तान या देशांमधून गुजरातच्या पोर्टवर हे ड्रग्स येतं, त्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक आणि पुण्यापर्यंत ते पोहोचवलं जातं. मुख्यमंत्री अनधिकृत बार, पबला बुलडोझर लावत आहेत. थोडीफार कारवाई करत आहेत. मात्र यामुळे पुण्याचे प्रश्न सुटणार नाहीत. ड्रग्जमुळे पिढ्यानंपिढ्या बरबाद होत असताना पुणेकरांनी रस्त्यावरती उतरणे आवश्यक आहे. तसंच मागे आम्ही या विरोधात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता. लाखो पालक रस्त्यावरती उतरले होते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स प्रकरण होऊनही पुणे अद्याप थंडच आहे, अशी खंत राऊतांनी व्यक्त केली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे फक्त नागरिकांच्या दबावपोटी कारवाईचे नाटक करत आहेत. नागपूर पासूनचा त्यांचा इतिहास तपासून घेण्याची गरज आहे. ते 'आरएसएस'शी संबंधित आहेत. त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चमचेगिरी करता येते. त्यांना शहराच्या भविष्याविषयी काही पडलेलं नाही. कल्याणी नगर अपघात प्रकरणांमध्ये देखील आयुक्तांनी कशाप्रकारे कारवाई केली हे सर्वांच्या समोर आहे. आमदार रवींद्र धंगेकर आणि जनतेच्या दबावामुळे त्यांना कारवाई करणे भाग पडलं, असंही राऊत म्हणाले.

गरज सरो, वैद्य मरो

भाजपचे पदाधिकारी अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी भूमिका घेताना दिसत आहेत. या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, भाजपची राज्यात आणि केंद्रात 'गरज सरो आणि वैद्य मरो' ही भूमिका राहिली आहे. भाजपसोबत आम्ही 25 वर्ष राहिल्यानंतर जो अनुभव घेतला. तोच अनुभव आता जगन मोहन रेड्डी आणि नवीन पटनाईक घेत आहेत. सर्व ठिकाणी भाजपने लोकांना गरजेपुरत वापरून घेतलं आणि गरज संपल्यानंतर फेकून दिलं असा आरोपही राऊतांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT