Heramb Kulkarni On Ajit Pawar NCP Sarkarnama
पुणे

Heramb Kulkarni On NCP : अजितदादा या प्रश्नांचे उत्तरे द्याल का? सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींचे टोकदार सवाल!

सरकारनामा ब्यूरो

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजप प्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत, उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनीही शपथ घेतली. राष्ट्रवादीतील या फुटीमुळे पक्षातील बहुतांश नेते हे अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. पक्षातील नेते छगन भुजबळ, आमदार अमोल मिटकरी हे नेहमी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाविरूद्ध भूमिका घेणारे नेतेही अजित पवारांसोबत गेले. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसवर (अजित पवार गट) काही जणांकडून टीका करण्यात येत आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पुरोगामी चळवळीचे महत्त्वपूर्ण चेहरा असलेले हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांनी भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे. राष्ट्रवादीवर टीका करत त्यांनी एकूण १२ प्रश्न उपस्थित केले आहेत. हेरंब कुलकर्णी म्हणाले, "भाजप सोबत गेल्यापासून छगन भुजबळ,अमोल मिटकरी यांची त्या सत्तालोलुप निर्णयाला तात्त्विक झालर देण्याची केविलवाणी धडपड संतापजनक आहे. भुजबळ यांनी तर महात्मा फुले व आंबेडकर यांचे चूकीचे दाखले दिले व त्यांनीच सत्ता मिळवावी, असे विधान करून त्या महापुरुषांचा अपमान केला आहे."

"या नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांचा अधिक कांगावा ऐकून न घेता काही प्रश्नांची उत्तरे हे नेते भेटतील तिथेचा त्यांनी काही प्रश्न विचारले पाहिजे," असे म्हणत हेरंब कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकूण १२ प्रश्न विचारले आहेत.

हेरंब कुलकर्णी यांचे बारा प्रश्न -

१) केवळ महाराष्ट्रपुरते नाही तर मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा देत त्यांचे कौतुक अजितदादा यांनी केले आहे.या मोदी सरकारच्या काळात मॉब लिंचींग मध्ये गरीब मुस्लिमांना मारलेल्या गुंडांना सरकारने पाठीशी घातले, त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचे आहे ?

२) संजीव भट, उमर खालिद , भीमा कोरेगाव मधील तुरुंगात टाकलेले सामाजिक कार्यकर्ते यांना ज्या अन्यायकारक रितीने तुरुंगात टाकले आहे. ते राष्ट्रवादी पक्ष म्हणून तुम्हाला मान्य आहे का ? त्याचे तुम्ही समर्थन करत आहात का ?

३) नवाब मलिक हे तुमचेच सहकारी यांना जामीन ही मिळू दिला जात नाही त्याविषयी हा सुड आहे असे वाटते आहे का ?

४) बिल्कीस बानो चे आरोपी सोडून दिले,त्यांचे सत्कार झाले. हातरस ऊन्नाव येथील पीडिता यांचे जगणे मुश्किल केले. महिला पहिलवान यांचे चारित्रहनन केले, या सर्व प्रकरणात आरोपी पाठीशी घातले गेले. महिला धोरण आणलेल्या पक्ष विचारांचे वारसदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत? याचा तुम्ही धिक्कार करणार का? ब्रिजभूषण ची हकालपट्टी झाल्याशिवाय NDA त सामील होणार नाही अशी भूमिका घेणार का?

५) धार्मिक दंगली करून राम मंदिर आंदोलन ज्यांनी चालवले, मुंबईत भीषण दंगली झाल्या. शेकडो जीव गेले.रामाचा राजकीय वापर केला त्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दंगली केलेल्या भाजप सोबत सहभागी होणार का ?

६) महात्मा फुले यांचा अपमान केलेले राज्यपाल भगतसिंग कोषारी, भिडे गुरुजी यांनी वादग्रस्त विधाने केल्यावर भाजपाने पाठीशी घातले. भाजपने निषेध ही केला नाही. किमान पहिल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी नाराजी तरी व्यक्त केली आहे का ?

७) नांदेड च्या दलित तरुणाचा खून झाल्यावर भाजप सरकारचा एकही मंत्री त्या कुटुंबाला भेटायला गेला नाही. याबद्दल काही जाब विचारणार का ?तुमचे मंत्री तरी भेट देतील का ?

८) ७०००० कोटीचा भ्रष्टाचार करणारी नॅचरल करप्ट पार्टी असे जाहीर बोललेल्या नरेंद्र मोदी यांनी ते विधान अजूनही मागे घेतलेले नाही. याबद्दल त्यांना जाब विचारणे,खुलासा करणे किंवा मिटवून घेणे यापैकी नेमके काय करायचे ठरले आहे ?

९) बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत मानत आहोत असे म्हणत असाल तर या सरकारने पाठ्यपुस्तकातून लोकशाही हा पाठ हटवला, सामाजिक चळवळी, वैज्ञानिक धडे हटवून इतर अंधश्रद्धा वाढवणारे पाठ आणत आहेत. पक्ष म्हणून NDA च्या पहिल्या बैठकीत आपली भूमिका मांडणार आहात का ?

१०) महात्मा गांधी हे जर तुमचे आदराचे स्थान असेल तर नथुराम गौरव करणाऱ्या प्रज्ञासिंगवर पक्षाने कारवाई करावी,पुन्हा तिकीट देऊ नये अशी भूमिका घेणार का ?

११) भाजपच्या कल्पनेतील हिंदुस्थान व फुले आंबेडकर यांच्या कल्पनेतील संविधानाने निर्माण केलेला बहुविध भारत हे एकच आहेत अशी पक्षाची भूमिका आहे का ? नसेल तर त्या भूमिकेला विरोध कसा नोंदवणार आहात व भाजप ती भूमिका सोडणार नसेल तर तुम्ही भाजपला सोडणार आहात का ?

१२) ज्या फुले शाहू आंबेडकर यांनी वर्णव्यवस्था नाकारली त्याच उच्च नीच व्यवस्थेचे उदात्तीकरण करणाऱ्या ग्रंथांना,संस्थांना प्रतिष्ठा देणाऱ्या भूमिका थेट फुले आंबेडकर विरोधी आहेत हे म्हणण्याचे धाडस तुम्ही दाखवणार आहात का ? की फुलेवाडा व रेशीमबाग एकाचवेळी योग्य आहे असे तुमचे मत आहे?

आजपर्यंत पुरोगामी प्रतिमा मिरवलेल्या छगन भुजबळ, अमोल मिटकरी अजित पवार यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत व जिथे जातील तिथे यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत, असे हेरंब कुलकर्णी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT