Mahavikas Aghadi Sarkarnama
पुणे

Mahavikas Aghadi News : मुख्यमंत्रि‍पदावरून शरद पवार नाना पटोलेंचं एकमत, नेमकं काय म्हणाले?

Sudesh Mitkar

Pune News, 04 Sept : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी ठरवायचा की निवडणुकीनंतर यावरून चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील सर्व पक्षाने एकमताने मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडावा अशी भूमिका घेतली आहे.

यामुळे निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल असं ठाकरे यांचं म्हणणं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली असून त्या भूमिकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सहमती दर्शवली आहे.

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "मुख्यमंत्रि‍पदाचं घोडे कुठेही अडलं नाही. निवडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाबाबत निर्णय घ्यायचा असतो. अजून कशाचाही पत्ता नाही. महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असं वातावरण आहे. पण, मुख्यमंत्रि‍पदाबाबत आताच मांडणी करण्याची आवश्यकता नाही."

दरम्यान आज काँग्रेसची (Congress) महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात पार पडत आहे. त्यानिमित्त काँग्रेसचे राज्यातील सर्व दिग्गज नेते पुण्यात उपस्थित आहेत. यादरम्यान नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातत्याने पुण्यात घडणाऱ्या घटना या चिंताजनक असून पोलिसांचा गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहिलेला नाही.

पोलिस दलातील बदलांसाठी पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांचे कनिष्ठ अधिकारी ऐकत नाहीत. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीच निवड चुकीच्या मार्गाने सरकारने केली आहे. तसेच मालवण आणि बदलापूर प्रकरणातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. हे सरकार अपयशी ठरलं असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे."

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून इव्हेंटबाजी केली जात आहे. त्यासाठी करोडो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना वेळेवर सरकार नुकसान भरपाई देत नसल्याचा आरोप यावेळी पटोले यांनी केला.

दरम्यान, महाविकास आघाडीतील दोन प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. याबाबत पटोलेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शरद पवार बोलले ते बरोबरच आहे. निवडणुकीनंतर कोणाचं किती संख्याबळ आहे. त्यानुसारच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवणं योग्य ठरणार आहे. मात्र, याबाबत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय जाहीर करण्याच्या मागणीबाबत आधीच बोलून झालंय आहे, असं म्हणत पटोले यांनी पवारांच्या वक्तव्याला सहमती दर्शवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT