NCP
NCP Sarkarnama
पुणे

NCP News : शिंदे गटाचे तीन आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात : या भागातील आमदार असल्याचा राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट

प्रफुल्ल भंडारी

दौंड (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दौंडमध्ये बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्या अस्वस्थ आमदारांमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील तीन आमदार (MLA) आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. शिंदे गटातील हे तीन आमदार विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, असा दावाही मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Three MLAs of Shinde faction in touch with NCP: Amol Mitkari)

आमदार अमोल मिटकरी यांनी हा दावा दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना केलेला आहे. आमदारांवर विश्वास नसल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपूरमधील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्याच दिवशी शिंदे-फडणवीस यांचे सरकार कोसळेल, असा दावाही आमदार मिटकरी यांनी केला आहे.

शिंदे गटातील तीनही आमदार हे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्षाचेही काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांचा आकडा आताच सांगणार नाही, असे सांगून मिटकरी यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केले. त्यानंतर राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा किंवा भाजपचे सदस्यत्व सोडायला हवे होते. पण, भाजपने उदयनराजे भोसले यांना मेळावा घ्यायला लावून मराठा समाजाची मते महाविकास आघाडीकडे जाऊ नये, अशी तजबीज केली. गुजरात विधानसभेची निवडणूक संपल्याने राज्यपाल कोश्यारी यांचा येत्या दोन ते तीन दिवसांत निरोप समारंभ होईल. वादग्रस्त व अनुचित विधाने करणारे राज्यपाल हे मोहरा असून खरे प्यादे वेगळेच आहेत, अशी टिप्पणीही मिटकरी यांनी केली.

चंद्रकांत पाटलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते

पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक ही लोकशाहीला धरून नाही. पण, ते एकदा बोलता आणि नंतर माफी मागता, याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक बोलत आहात, असा होता. आपण कॅबिनेट मंत्री आहोत, एवढी तरी अक्कल त्यांना असायला हवी होती. ते महापुरूषांविषयी असे कसे बोलू शकतात?. भीमसैनिक या प्रकरणामध्ये खवळला तर शांत राहणार नाही, त्यामुळे भविष्यात अनेक संकटांना चंद्रकांत पाटील यांना सामोरे जावे लागू शकते, अशी भीतीही मिटकरी यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT