Tanaji Sawant
Tanaji Sawant  Sarkarnama
पुणे

Tanaji Sawant : वादाची हॅटट्रिक टाळण्यासाठी मंत्री सावंतांनी राजकीय प्रश्नच टाळले

उत्तम कुटे

पिंपरी : बेधडक, वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत हे समीकरणच आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी आपल्या अशा विधानातून दोन वाद ओढवून घेतले. त्यापासून धडा घेत वादाची हॅटट्रिक चुकविण्यासाठी त्यांनी आज (ता.२४) पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय प्रश्नच टाळले. त्याला त्यांनी उत्तरच दिले नाही.

गेल्या तीन वर्षात दोन मंत्रीपदाच्या काळात डॉ.सावंत यांनी एकदा नाही, तर तीनदा वादग्रस्त आणि काहीशी अज्ञानमुलक विधाने केल्यामुळे मोठा वाद ओढवून घेतलेला होता. त्याबद्दल त्यांना तीनदा माफी मागावी लागली होती. त्यामुळे उद्योगनगरीत नवी सांगवी येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी आज राजकीय प्रश्नांवर अजिबात बोलायचे नसल्याचे सांगत वाद निर्माण होणाऱ्या प्रश्नांना बगल दिली.

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला घाबरल्याने सत्ताधाऱ्यांनी कोरोनाची लाट आणल्याच्या शिवसेना नेते (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार देताना कुठल्याही राजकीय प्रश्नावर भाष्य करणार नसल्याचे त्यानी निक्षून सांगितले. आरोग्य विभागाशा सबंधित प्रश्नांनाचे त्यांनी उत्तरे दिली.

महाराष्ट्रातील कोरोनाची लाट संपल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. त्याचवेळी राज्यात या साथीचे अद्याप १३२ रुग्ण असल्याचेही सांगितले. जगात चीन, उत्तर आणि दक्षिण कोरिया, अमेरिका, ब्राझील येथे कोरोनाचा बीएफ ७ हा नवा व्हेरियंट आला असला, तरी भारतात हे संकट आलेले नाही, असे ते म्हणाले.

फडणवीस सरकारमध्ये ते जलसंधारणमंत्री होते. त्यावेळी कोकणात तुफान आले. अतिवृष्टी होऊन तिवरे धरण फुटले. त्याचे खापर त्यांनी खेकड्यांवर फोडले. खेकड्यांमुळे हे धरण फुटल्याच्या त्यांच्या काहीशा अज्ञानी वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. तर, त्यानंतर त्यांनी अशी दोन विधाने शिंदे-फडणवीस या सध्याच्या सरकारमध्ये सार्वजनिक आऱोग्यमंत्री झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात केली होती.

पुणे (Pune) येथील ससून रुग्णालयाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी औषधे कमी पडत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यावर तुम्ही त्या हाफकिन माणसाकडून औषधे घेणे बंद करा, असे ते सर्वांसमक्ष बोलले. त्याचीही मोठी चर्चा झाली. नंतर त्यांनी त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यानंतर त्यांनी राज्यात सत्तांतर होताच यांना मराठा आरक्षणाची खाज सुटली, असे आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यातील मराठा समाजात संतापाची लाट उसळली होती. या तिन्ही वक्तव्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT