Shivsena-NCP
Shivsena-NCP Sarkarnama
पुणे

झेडपी गटांच्या पुनर्रचनेमुळे भोरमधील दोन युवा नेते अडचणीत?

किरण भदे

नसरापूर (जि. पुणे) : भोर (bhor) तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीचे आठ गणांची रचना जाहीर झाली आहे. यामध्ये वेळू-नसरापूर आणि कामथडी-भोंगवली या दोन जिल्हा परिषदेच्या गटाच्या रचनेवरुन तालुक्यात मोठ्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. गण आणि गटाच्या रचनेच्या माध्यमातून तालुक्यातील दोन युवा नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या दोन्ही नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढवली असून भविष्यातही ते आमदारकीच्या (MLA) मैदानात उतरू शकतात. या रचनेमागे नेमके कोण, असा प्रश्न तालुक्यात चर्चिला जात आहे. (Two young leaders in Bhor are in trouble due to reorganization of ZP groups)

भोर तालुक्यात लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे चार गट आणि आठ गणांची रचना नुकतीच जाहीर झाली आहे. तत्पूर्वी तालुक्यात 2012 पर्यंत वेळू-नसरापूर, भोंगवली-संगमनेर, रायरी-ऊत्रौली व शिंद-भोलावडे हे चार गट होते. मात्र, 2017 मध्ये लोकसंख्येप्रमाणे रचना होऊन यामधील भोंगवली संगमनेर गटाचे विभाजन झाले. वेळू-भोंगवली, नसरापूर-भोलावडे व कारी-उत्रौली हे तीन गट झाले होते. आता 2022 ला पुन्हा लोकसंख्येच्या प्रमाणे तालुक्यात वेळू-नसरापूर, भोंगवली-कामथडी, भोलावडे-शिंद, कारी-उत्रौली या चार गटाची निर्मिती झाली आहे.

हे गट तयार करताना 2012 प्रमाणे रचना अनेकांना अपेक्षित होती. मात्र, नवीन रचना करताना वेळू-नसरापूर गटाच्या नसरापूर गणातील करंदी खे.बा., कामथडी, खडकी, उंबरे ही चार गावे काढून ती जुन्या भोंगवली-संगमनेर गटातील संगमनेर गणाचे नाव कामथडी करून त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत, तर जुन्या संगमनेर गणातील गुंजवणी नदी पलीकडील तांभाड, हातवे खुर्द, हातवे बुद्रुक व मोहरी बुद्रुक ही चार गावे नसरापूर गणाला जोडली आहेत.

भोर तालुक्यात चार गट नव्याने निर्माण करताना 2012 च्या प्रमाणेच रचना केली आहे. फक्त नसरापूर गण व जुना संगमनेर गण यामधील चार-चार गावांची आदलाबदल केली आहे, यामुळेच तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. आमदारकीसाठी लढलेले आणि भविष्यातदेखिल लढण्याची शक्यता असलेल्या दोन युवा नेत्यांना या गट आणि गणांच्या रचनेच्या माध्यमातून अडचणीत आणण्यात आणल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका युवा नेत्याच्या गावासहीत त्यांचे हक्काचे मतदान असलेल्या चार गावांना त्यांच्या जिल्हा परिषद गटामधून बाहेर काढल्याने हा युवा नेता अडचणीत येईल, अशी यामागे अटकळ असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे बऱ्यापैकी प्राबल्य असलेल्या नसरापूर गणातील चार गावे काढून ती दुसऱ्या गटातील कामथडी गणात टाकली असल्याने सातारा महामार्ग पट्ट्यातील शिवसेनेच्या प्राबल्याला अटकाव बसेल, अशी यामागची खेळी असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत नसरापूरला लागून असलेली कामथडी, खडकी, उंबरे, करंदी ही चार गावे नसरापूर गणातून बाजूला करुन भौगोलिकदृष्ट्या लांब असलेली गुंजवणी नदीच्या पलीकडची तांभाड, हातवे बु. हातवे खु. मोहरी बु. ही गावे नसरापूर गणाला जोडण्यामागे काय कारण आहे, हे करण्यामागे कोणत्या राजकीय व्यक्तीने हस्तक्षेप केला, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT