Pune News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी रायगड येथील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमांमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अमित शहा यांनी एकेरी उल्लेख केला आणि औरंगजेबाच्या थडग्याचा समाधी म्हणून उल्लेख केल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे. याबाबत सातत्याने खासदार संजय राऊत हे टीका करताना पाहायला मिळत आहेत. या टीकेला भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत हे रोज नवनवीन शोध लावत असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रायगडला आले होते. समाधीचा जीर्णोद्धार केल्यानंतर शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने करण्यात आलेला कार्यक्रमाला अमित शहा यांनी उपस्थिती लावली. याचं स्वागत करायचं सोडून, गेले तीन दिवस संजय राऊत हे नुसतेच बोलत सुटले आहेत. मात्र त्यांना कोणीच प्रतिसाद देत नाही, असं चित्र आहे.
राजकीय दुश्मनी असावी, मात्र देशाचे गृहमंत्री पहिल्यांदा अशा प्रकारच्या कार्यक्रमप्रसंगी रायगडला आले असताना त्यांच्या या कृतीचे स्वागत होणे आवश्यक होतं. अमित शहा यांनी स्वतः तयार केलेलं 500 पानी छत्रपती शिवाजी महाराजांवरचे पुस्तक पुढील काही दिवसांत येणार आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात अथवा दिल्लीत होणार आहे. हे पुस्तक पाहिल्यानंतर संजय राऊत यांना देखील चक्कर येईल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अमित शहा यांनी इतका अभ्यास केलाय, हे त्यांना समजेल.
संजय राऊत हे फक्त अमित शहा यांचा दुस्वास करत आहेत. कारण ते सत्तेमध्ये नाहीत आणि त्यांना सत्तेमध्ये यायचंय मात्र घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार, असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. ठाकरे यांच्याकडील सर्व लोक निघून चालले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्याकडे उभे करायला देखील लोक राहणार नाही. आत्ता पुण्यातील पाच माजी नगरसेवक आमच्याकडे आले आहेत. तसेच मुंबईतील 92 पैकी 57 माझी नगरसेवक शिंदें सोबत असतील. त्यामुळे याकडे संजय राऊत यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचा टोला पाटलांनी लगावला.
अमित शहा समाधी बोलले की कबर बोलले, याकडे राऊत यांचे लक्ष आहे. अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायला आले असल्याने त्यांच्या डोक्यात समाधी हे होतं, त्यामुळे ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले असतील. म्हणून अशा प्रकारची टीका करणे चुकीचे असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
ठाकरेंची सेना आमच्यासोबत येणार की नाही त्यांना घ्यायचं का नाही हा माझा विषय नाही. मात्र सद्य परिस्थिती पाहता त्यांना मुंबई महापालिकेत देखील माणसं उभं करायला मिळणार नाहीत. याचा अर्थ असा नाही की ते सत्तेत येण्यासाठी मागे लागलेत अथवा आम्ही त्यांना घेत नाही. मी फक्त प्रेडिक्शन दिलं. ते जर सत्तेसोबत आले नाहीत तर इतक्या मोठ्या प्रमाणात गळती होईल की त्यांना कुठेच उभी करण्यासाठी माणसे मिळणार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.