Urmila Matondkar
Urmila Matondkar Sarakarnama
पुणे

Urmila Matondkar News : हिंदू-मुस्लिम भाई-भाई हा महाराष्ट्रातील एकोपा देशाला दिशा देणारा : मातोंडकरांचे मत !

सरकारनामा ब्यूरो

Pune News : "सद्यस्थितीत आपल्या समाजात धर्मा-धर्मांमध्ये अगदी क्षुल्लक कारणांवरून वाद-विवाद निर्माण केले जात आहेत. मात्र महाराष्ट्र (Maharashtra) यासाठी अपवाद आहे. महाराष्ट्र राज्यात हिंदू मुस्लिम एकोप्याने, गुण्या गोविंदाने नांदतात. यामुळेच हिंदू-मुस्लिम भाई भाई असे वातावरण पाहायला मिळत असून, हे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणून दिसते. महाराष्ट्राचे हेच उदाहरण देशाला दिशा देणारे ठरणार," असे मत प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar News) यांनी व्यक्त केले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळ संस्थेच्या ५३ वा वर्धापनदिन काल बुधवार (दि.२२ मार्च) रोजी पार पडला. या कार्यक्रमात मातोंडकर बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास माजी खासदार अली अनवर अंसारी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी, डॉ. बेनझीर तांबोळी. रजिया सुलताना, प्रा. जमीर शेख, प्रा. सायरा मुलाणी, दिलावर शेख आणि उपजिल्हाधिकारी वसीमा शेख, आदी उपस्थित होते. यावेळी प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यावर मात करत, संघर्ष करत उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या वसीमा शेख यांचा मातोंडकर यांचे हस्ते फातिमाबी शेख कार्यगौरव पुरस्कार देऊन, त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी मातोंडकर म्हणाल्या, ‘‘मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हमीद दलवाई यांनी मागासलेल्या मुस्लिम समाजाला संघटित केले. समाजातील मागासलेपण दूर व्हावे, या हेतूने त्यांनी या मंडळाची स्थापना केली. मागासलेल्या मुस्लिम समाज आणि विशेषत: महिलांना एक चांगला मंच मिळाला. याच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट प्रथा दूर व्हावे, यासाठी एक चळवळ उभी झाली. यातून समाजाचा सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न केले गेले. त्याकाळची आणि परिस्थिती यात प्रचंड विरोधाभास आहे. मात्र आज महाराष्ट्र राज्यात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजात एकोपा आह. हा एकोप्याचा संदेश देशासाठी दिशादर्शक आहे."

सद्यस्थितीत समाजात काही जण विषमता निर्माण व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले करतात. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी समाजाने जागृत होणे, ही आज गरज आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये भेद निर्माण करण्यापेक्षा, माणूस जात ही संकल्पना रूजणे, गरजेचे आहे. तरच देशात सर्वधर्मसमभाव वातावरण राहील. ज्योतिबा फुले, फातिमाबी शेख यांच्या महान कार्यामुळे आज समाजात महिला पुढे जाताना दिसतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहली, यामुळे देश आजही एकसंध राहिला, असे मत माजी खासदार अली अनवर अंसारी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. झहीर काझी यांची शिक्षण, समाज आणि वैद्यकीय क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल समाजप्रबोधन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. परंतु ते या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी मुस्लिम सत्यशोधक पत्रिका वर्धापनदिन विशेषांक आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ ः एम्स- परस्पेक्टिव्ह अँड मॅनिफेस्टो’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बेनझीर तांबोळी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जमीर शेख यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT