Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar On Ajit Pawar : अजित पवारांसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर कारवाई करणार का..? शरद पवारांचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Pune : राज्यात मोठा भूकंप झाला असून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही बंडखोरी झाली आहे. अजित पवारांसह ४६ आमदारांनी बंडखोरी करत भाजपा शिवसेनेच्या युती सरकारमध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

शरद पवार(Sharad Pawar) यांनी रविवारी (दि.२ जुलै) पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील उभ्या फुटीवर थेट भाष्य केलं, पवार म्हणाले, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर मी मोठी जबाबदारी सोपवली होती. मात्र आता त्यांच्यावरचा माझा विश्वास उडाला आहे असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बोलून बंडखोर आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा पवारांनी दिला आहे.

सहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस(Ncp)च्या आमदारांची बैठक बोलवली होती. पण त्याआधीच काही जणांनी वेगळी भूमिका घेतली. कुणी पक्षावर दावा केला तरी आम्ही लोकांमध्ये जाणार आहे. आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ते आहेत असंही शरद पवार म्हणाले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्री केले. भाजप(BJP)ने राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त केले त्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो असा मिश्किल टोलाही पवारांनी यावेळी लगावला. अजित पवारांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्याचे मला माध्यमांकडूनच समजल्याचंही पवार यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी आजचा प्रकार घडला तो माझ्यासाठी नवा नाही. त्यामुळे मी चिंतेत नाही. याआधीही 1980 असा प्रकार घडला होता. मी फक्त काही जणांचाच नेता होतो. पक्ष पुन्हा बांधला होता. त्यावेळी पक्ष सोडून गेलेले सर्व पराभूत झाले होते, राज्यातील मतदारांवर माझा विश्वास आहे असे म्हणत पुन्हा पक्ष बांधणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

ईडीच्या चौकशीमुळे काही आमदार अस्वस्थ होते. मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली. देशातील सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन आले. उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवर चर्चा झाली.शपथविधी समारंभात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते. पण पक्ष फुटला असे मी कधीच म्हणणार नाही. आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार आहोत असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

जर आम्ही अजित पवारांच्या विधानाशी सहमत असतो. तर आम्हीही त्यांच्यासोबत गेलो असतो. आता भाजपा शिवसेना युतीतील जे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. तसेच अजित पवारांच्या बंडांनंतरही त्यांनी कुटुंब फुटलं असं आम्ही कदापि म्हणणार नाही असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT