Ramdas Athavale and Raj Thackeray Latest News
Ramdas Athavale and Raj Thackeray Latest News Sarkarnama
पुणे

`बीजेपी` आणि आरपीआय`ची आहे आघाडी `मनसे`ला मध्ये आणून करू नका बिघाडी

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) येथे कुणी घ्यायचा यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात सध्या ठसन सुरु आहे. त्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी काल (ता.११ सप्टेंबर) लोणावळा येथे मीडियाशी बोलताना भाष्य केले. शिवाजी पार्कवर शिंदे गटाचाच मेळावा होईल,असे ते म्हणाले. कारण तशी आपली मागणीच आहे,असेही त्यांनी सांगितले. (Ramdas Athavale and Raj Thackeray Latest News)

`बीजेपी` आणि आरपीआय`ची आहे आघाडी त्यामुळे `मनसे`ला मध्ये आणून करू नका बिघाडी असे उत्तर आठवले यावेळी आपल्या खास काव्यमय अंदाजात मनसेच्या भाजपबरोबरच्या आघाडीच्या चर्चेच्या विचारलेल्य प्रश्नावर दिले. शिंदेसारखा मोठा गट आल्याने भाजपला आता `मनसे`ची गरज नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मनसेच्या भुमिकेचा (मराठेतरांना विरोध) देश पातळीवर भाजपला फटका बसू शकतो,असे कारण त्यांनी त्याकरिता दिले. त्यामुळे मनसेची आघाडी त्यांना परवडणारी नाही,असे मत त्यांनी मांडले.

आरपीआयच्या (आठवले गट) राज्य कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर ते मीडियाशी बोलत होते.उद्धव ठाकरेंचे मुंबईवरील वर्चस्व खालसा करण्यासाठी आरपीआय ही भाजपा व शिंदे गटाला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई महापालिकेवर भाजप- शिंदेची शिवसेना व आरपीआयचा झेंडा फडकवणार असल्याची भविष्य़वाणी त्यांनी केली.आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिका निवडणुकीत आरपीआयने भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात पक्षाला मान्यता मिळवायची असल्यास त्याकरिता पक्षाचे किमान १२ ते १३ आमदार व दोन खासदार निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी २०२४ च्या लोकसभेला भाजपाकडे लोकसभेच्या तीन जागांची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळेच शिवसेनेत फूट पडल्याचा दावाही आठवलेंनी यावेळी केला. जर, त्यांनी दोन्ही कॉंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला नसता, तर शिवसेनेतील फूट टळली असती. त्यांच्या या चुकीच्या निर्णयामुळेच त्यांना जबर धक्का शिंदे यांनी दिला. मात्र, शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निर्णय दीड वर्षांपूर्वी घ्यायला पाहिजे होता, असेही ते म्हणाले. शिंदेंनी शिवसेना सोडल्याने मुंबईत ठाकरेंची शिवसेना दुबळी झाली असून, त्यांची अवस्था दयनीय आहे. काँग्रेसही दुबळी झाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेची व काँग्रेसची सत्ता मुंबईत येण्याची चिन्हे अजिबात नाहीत. तर, राष्ट्रवादीची सुद्धा तेवढी ताकद मुंबईत नसल्याने त्यांच्या आघाडीचाही शिवसेनेला पुन्हा महापालिकेत सत्तेत येण्यासाठी फायदा होणार नाही, असाही अंदाज आठवलेंनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT