<div class="paragraphs"><p>Sudhir Mungantiwar, Dilip Walse Patil - Anil Parab.</p></div>

Sudhir Mungantiwar, Dilip Walse Patil - Anil Parab.

 

Sarkarnama

राज्य

वळसे पाटील हे नामधारी; अनिल परब हेच खरे गृहमंत्री!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यात सत्तेत असेलेल्या महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांंनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. कुंभकर्णालाही लाजवले अशा पद्धतीने हे सरकार झोपलेले आहे. तर कधी झोपेचे सोंग घेऊन आहे, अशी टीका त्यांनी राज्य सरकारावर केली आहे. दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) हे राज्याचे केवळ नामधारी गृहमंत्री असून कार्यकारी गृहमंत्र्यासारखे अनिल परब (Anil Parab) वागत असल्याची खोचक टीका त्यांनी वळसे पाटलांवर केली. ते विधान सभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलत होते.

मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, आपण शाळेत शिकत असताना आपल्याला शिक्षक नेहमी म्हणायचे की, महाराष्ट्रात एकविसाव्या शतकात 'जमिनो के और कमिनो के ज्यादा भाव होंगे', अशीच परिस्थिती महाराष्ट्रात आज निर्माण झाली आहे. महिलांवरील सामूहिक बलात्कारांच्या घटनांनी तर राज्याला लाज आणली आहे. पण गृहविभाग यावर विचार करायलाही तयार नाही. वळसे पाटील हे सरकारमधील केवळ नामधारी गृहमंत्री आहेत. कार्यकारी गृहमंत्री तर अनिल परब असल्यासारखे वागतात, असे ते म्हणाले. पोलिस दलात गृहमंत्र्यापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सारेच भ्रष्टाचारात माखले आहेत, असा घणाघातही मुनगंटीवारांनी केला.

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) वकिलांनाही फसविले. वकिलांसाठी स्टायपेंड, निवृत्ती, वकील भवनाचे वचन देण्यात आले होते. हा वचननामाच सरकारने केराच्या टोपलीत फेकला आहे. पोलिस विभाग आता खंडणी वसुली विभाग बनला आहे. राज्यातील लहान मुली, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक अगदी कारागृहातील तृतीयपंथीही असुरक्षित असल्याकडे त्यांनी गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले.

महाविकास आघाडी सरकार हे आभासी सरकार

सरकारी आरोग्य यंत्रणेचा विचार केला तर, सरकारीवर पडतेय भारी खासगी आरोग्य यंत्रणा सारी अशी स्थिती आहे. कोविड साथीच्या काळात सरकारी दवाखान्यांमध्ये औषधी, ऑक्सिजन, सोयी-सुविधांची वानवा होती. खासगी दवाखाने मात्र, कमाई करीत होते. त्यांच्या अव्वाच्यासव्वा बिलवसुलीवर कुणाचेही नियंत्रण नव्हते. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक औषधांसाठी वणवण भटकत होते. सरकारमधील मंत्री मात्र सारेकाही एज्नॉय करीत होते. एकुणच काय तर महाविकास आघाडीचे सरकार आभासी सरकार आहे. मुख्यमंत्री जागेवर नाहीत. मंत्री भ्रष्टाचारांमध्ये गुंतले आहे. नेते आपसातील राजकारणामुळे एकमेकांना संपवायला निघाले आहेत. यात नुकसान मात्र राज्याचे होत आहे, असेही मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले.

विधिमंडळाच्या माध्यमातून आपण सरकारला जागेवर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. केवळ विरोध करायचा म्हणुन कोणताही मुद्दा सभागृहात उपस्थित करीत नाही. मात्र, त्यानंतरही सरकार केवळ भ्रष्ट्राचार आणि अनाचारातच बरबटलेले राहणार असेल, तर महाराष्ट्रातील जनता तीनही पक्षांना घरी बसण्याचे जबरदस्त व्हॅक्सिन दिल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल मुनगंटीवारांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT