Chandrakant Patil, Aditya Thackeray
Chandrakant Patil, Aditya Thackeray sarkarnama
राज्य

'देवेंद्र फडणवीसांच्या मागे लागून-लागून 2014 ला शिवसेना सत्तेत आली होती'

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिवसेनेतील (Shivsena) वाद वाढतच चालला आहे. या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीत. यामध्ये आता जुन्या घटनांवरूनही एकमेकांनी चिमटे काढण्यात येत आहेत. 2014 साली शिवसेना देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मागे लागून सत्तेत सहभागी झाली होती. ते पाच वर्ष सत्तेबाहेर असते तर त्यांची वाट लागली असती, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandakant Patil) शिवसेनेवर केली आहे. पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस हे सत्ता गेल्यापासून नैराश्यात गेले, अशी टीका केली होती. यावर पाटलांनी आज (ता.22 फेब्रुवारी) प्रत्युत्तर दिले आहे.

पाटील म्हणाले, २०१४ साली भाजपकडे 122 आमदार होते. अपक्षांना घेऊन भाजप पाच वर्ष सत्ता चालवू शकले असते. मात्र, पाच वर्षाच सत्तेबार राहून शिवसेनेची वाट लागली असती. तेव्हा फडणवीसांच्या मागे लागून-लागून शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली होती. कालचक्र हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आजघडीला कालचक्र हे त्यांच्या बाजूने गेले आहे. मात्र, ते नक्की खाली येईल. हे शिवसेनेने विसरू नये. महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. त्यांच्यासाठी कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून त्यांना पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो, असा इशारा पाटील यांनी शिवसेना व महाविकास आघाडींच्या नेत्यांना दिला आहे.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी बोलतांना पाटील म्हणाले की, याबाबत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध–पाणी का पाणी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे, अश्या शब्दात पाटलांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान, अदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना म्हणाले होते की, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. तिथे कोरोना हाताळणीत भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. तसेच बेरोजगारीचा तेथे मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी राज्यातील विरोधी पक्ष वाटेल ते आरोप करत आहे. फडणवीस यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही. कारण त्यांना सत्ता गेल्यापासून खूप नैराश्य आले आहे. त्यामुळे ते असे बोलत असतात. त्यांच्यावर बोलण्यासारखे काही नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली होती. यावर उत्तर देतांना पाटलांनी अदित्य यांना 2014 साली शिवसेना कशी सत्तेत सहभागी झाली होती यावरून शिवसेनेला हिनवले आहे. आता यावर शिवसेना नेते काय प्रतिक्रिया देतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT