Bhgat singh Koshyari Sarkarnama
राज्य

राज्यपाल कोश्यारींची 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया, मात्र माफी मागितली नाही..

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी औरंगाबाद येथे बोलतांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या व त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात होती.

याप्रकरणी राज्यपाल कोश्यारी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहे. आणि मला त्यांच्याबद्दल जितकी माहिती होती. त्यानुसार मला असे वाटले की समर्थ रामदास हे त्यांचे गुरू आहेत. त्यामुळे मी हा संदर्भ दिला. मात्र, याबाबत काहीजणांनी मला काही तथ्य सांगितले त्या तथ्याची आपण माहिती घेणार आहे, अशी प्रतिक्रिया कोश्यारी यांनी दिली आहे. त्यांनी आज (ता.28 फेब्रुवारी) जळगाव येथे कवयत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहे. आणि मला जितकी माहिती होती. त्यानुसार मला वाटले की समर्थ रामदास त्यांचे गुरू आहेत. मात्र, इतिहासाचे काही तथ्य मला काहीजणांनी सांगितले त्या तथ्याचा अभ्यास केला जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र, याप्रकरणी माध्यम प्रतिनिधींनी आपण या वक्तव्याबद्दल माफी मागणार का? असे विचारले. मात्र, याबद्दल त्यांनी काहीच प्रतिक्रिया न देता ते निघून गेले.

कोश्यारी यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी राज्यभरातील शिवप्रेमींकडून व महाविकास आघाडीच्या नेत्याकडून होत आहे. यावर कोश्यारी यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबाद येथे एका कार्यक्रमावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी गुरु विषयीचे महत्व सांगताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. गुरुमुळे शिष्य घडत असतो असे सांगताना महाराजांचा एकेरी उल्लेख करत "समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असत" असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT