देशभरात महागाईचा ताण वाढत असताना आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सामान्य नागरिकांची चिंता आणखी वाढवली आहे. सध्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.
पेट्रोल- डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे भाजीपाला, खाद्यतेल आणि दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती बजेट कोलमडले असताना आता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने चिंता आणखी वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात इंधनाचे दर आणखी वाढू शकतात.
मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी आली होती. भारत जवळपास 88% कच्चे तेल आयात करत असल्याने जागतिक घडामोडींचा थेट परिणाम देशातील इंधन दरांवर होतो. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर दरवाढीचा निर्णय घेतला गेला, तेव्हा तेल कंपन्यांचा एकत्रित तोटा 1.2 लाख कोटींवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे गेल्या 11 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये चार वेळा वाढ करण्यात आली आहे. या कालावधीत प्रति लिटर तब्बल 7 पेक्षा अधिक वाढ झाली आहे. सुरुवातीला 3 ची वाढ झाली, त्यानंतर 90 पैसे, मग 87 पैसे आणि आता 2.61 प्रति लिटर दर वाढवण्यात आले. मात्र एवढ्या वाढीनंतरही सरकारी तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी झालेला नाही.
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांना गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढले असतानाही देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल 74 दिवस स्थिर ठेवण्यात आले होते. त्यामुळे कंपन्या महागडे कच्चे तेल खरेदी करत होत्या, पण ग्राहकांना जुन्याच दरात इंधन विकत होत्या.
अंदाजानुसार, कंपन्यांचा पूर्ण तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे दर अजून 20 ते 25 प्रति लिटरपर्यंत वाढण्याची गरज आहे. मात्र एकाचवेळी एवढी मोठी दरवाढ करणे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या कठीण असल्याने टप्प्याटप्प्याने किंमती वाढवल्या जाऊ शकतात.
दरम्यान, इराण आणि अमेरिकेमधील संभाव्य चर्चेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये काहीशी घसरण झाली आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी तज्ज्ञांच्या मते शिपिंग खर्च, विमा प्रीमियम आणि भू-राजकीय तणाव कायम असल्याने इंधन दरांवरील दबाव पूर्णपणे कमी झालेला नाही.
सरकारसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे महागाई रोखण्याचा दबाव आहे, तर दुसरीकडे तेल कंपन्यांचा वाढता तोटा भरून काढण्याची गरज आहे. त्यामुळे ग्राहकांना मिळालेला सध्याचा दिलासा तात्पुरताच ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.