Dinvishesh 11 October Sarkarnama
विशेष

11th October in History : चंद्रावरील स्वारीची 'या' दिवशी झाली होती रंगीत तालीम

Rashmi Mane

11th October in History: मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले ते २० जुलै १९६९ रोजी. अपोलो ११ या चांद्रयानातून नील आर्मस्ट्राँग याने चंद्रावर पाऊल ठेवले. मानवाला चंद्रावर उतरविण्यासाठी या आधी अनेक प्रयत्न झाले होते. पण ते अयशस्वी ठरले होते. पण मानवाला चंद्रावर उतविण्यासाठीची मोहिम हाती घेण्याअगोदर अमेरिकेने सुमारे वर्षभर आधी एक यशस्वी मोहिम राबवली.

११ ऑक्टोबर, १९६८ रोजी अमेरिकेने सॅटर्न १-८ या राॅकेटमधून तीन मानवांना अंतराळात पाठवले. मानवाला चंद्रावर उतरविण्याच्या मोहिमेची ही रंगीत तालीम होती. पायलट वाॅल्टर कनिंगहॅम, कमांड पायलट वाॅल्टर एम. शीरा आणि सिनिअर पायलट डाॅन एफ. आयझेल हे अंतराळात जाणारे पहिले मानव ठरले.

अमेरिकेने सॅटर्न राॅकेटच्या सहाय्याने केप केनेडी अंतराळ तळावरुन अपोलो ७ हे यान अंतराळात सोडले. 22 ऑक्टोबर १९६८ पर्यंत हे यान अंतराळात होते. १० दिवस २० तास, ९ मिनिटे तीन सेकंद या काळात या यानाने ४५ लाख, ४६ हजार ९१८.३ मैल अंतर पार केले होते.

२२ ऑक्टोबर १९६८ रोजी सकाळी अटलांटिक महासागरात हे यान उतरविण्यात आले. युएसएस ईसेक्स या अमेरिकन नौदलाच्या जहाजाच्या मदतीने हे यान आणि अंतराळवीर बाहेर काढण्यात आले.

निधन संत तुकडोजी महाराजांचे

आजच्याच दिवशी म्हणजे ११ ऑक्टोबर १९६८ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अमरावती जिल्ह्यातील मोझरी खेड्यात गुरुकुंज आश्रमात वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या विरोधात एल्गार उठवला होता. संत तुकडोजी महाराज खंजिरी भजनात प्रवीण होते. फारसे शिक्षण नसतानाही ते स्फूर्तीदायक कविता सहज रचत. चिमूर अष्टी स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिश सरकारने त्यांच्या काही भजनांवर बंदी आणली आणि त्यांना चार महिने तुरुंगात डांबले होते.

गांधी-विनोबांच्या चिंतनाचा सुरम्य काव्यात्म आविष्कार म्हणजे तुकडोजी महाराज यांची 'ग्रामगीता. गावे सुखी होवोत, निरोगी राहोत हे तत्त्व मनाशी धरुन संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली.

या ग्रामगीतेच्या अर्पण पुत्रिकेत तुकडोजी महाराज म्हणतात....

मानवाची पूर्णता तुजसी | प्राप्त व्हावी मना वाटे |

म्हणोनी केली ‘ग्रामगीता’ | जागृत व्हाया ग्रामदेवता |

तर ग्रंथाची फलश्रुति करताना लिहिताता...

मित्रत्व वाढो त्रिभुवनी | तुकड्या म्हणे ध्येय हेचि |

अशा या महान व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली......

दिनविशेष - 11 ऑक्‍टोबर

1917 ः तपस्वी संघ प्रचारक, समाजसुधारक नानाजी देशमुख यांचा जन्म. त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानमार्फत राष्ट्र नवनिर्माण प्रकल्पाचा अभिनव प्रयोग साकार करीत रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली. डोमरी येथील सोनदरा गुरुकुलम ही आश्रमशाळा, चित्रकूट येथील ग्रामोदय विश्वविद्यालय, उदयमिता विद्यापीठ, आयुर्वेद विद्याप्रतिष्ठान, गोमाता संगोपन विकास प्रकल्प ह्या आणि अशा संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे प्रचंड जाळे त्यांनी निर्माण केले. 1997 मध्ये पुणे विद्यापीठाने "डॉक्‍टर ऑफ लेटर्स' ही सन्माननीय पदवी त्यांना प्रदान केली.

1946 ः जगप्रसिद्ध सेंटर फॉर डेव्हलपमेंट फॉर ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) या प्रगत संगणकीय विकसन केंद्राचे संस्थापक, ख्यातनाम संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचा जन्म. आठ ग्रंथांचे लेखन, संपादन तसेच पाऊणशे शोधनिबंधांमुळे संगणकीय विज्ञान क्षेत्रात त्यांनी मोलाची भर घातली. भारतीय आणि जागतिक संगणक संस्थांचे ते मार्गदर्शक आहेत.

1968 ः राष्ट्रसंत, समाजसुधारक म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज यांचे निधन. त्यांचे खरे नाव माणिक बंडोजी ठाकूर. त्यांनी ईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांना "राष्ट्रसंत' म्हटले जाते. "ग्रामगीता' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. एक्केचाळीस अध्यायांत आणि आठ पंचकांत विभागल्या गेलेल्या ग्रामगीतेत चार हजार सातशे पंचाहत्तर ओव्या आहेत. यात लोकशिक्षण, न्यायरक्षण आणि श्रमदान यांचे महत्त्व आणि उत्तर प्रचार तंत्र संघटनशक्तीचा महिमा, शिक्षण, महिलोन्नती, अंधश्रद्धा निर्मूलनाची महती वर्णन केली आहे.

1994 ः खडकी येथील दारूगोळा कारखान्यातील "एल-1' विभागाच्या एका इमारतीत स्फोट होऊन आठ कामगार ठार व चौघे जखमी.

2000 ः अंतराळात गेलेली पहिली महिला हा बहुमान मिळविणाऱ्या रशियाच्या व्हॅलेंटिना तेरेश्‍कोवा यांना "शतकातील महिला' हा पुरस्कार जाहीर. लंडनमधील "इंटरनॅशनल वूमन ऑफ द इयर' या संघटनेने या पुरस्काराची घोषणा केली.

2004 ः "लक्ष्य' या वैमानिकरहित व पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या विमानाची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली.

2005 ः वैमानिकांना प्रशिक्षण देणारे महर्षी वामन कृष्णाजी लिमये ऊर्फ भाऊकाका यांचे 86 व्या वर्षांत पदार्पण. सेंट्रल ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट हैदराबाद या भारताच्या सर्व विभागांतल्या वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थापक सदस्य म्हणून त्यांचा गौरव केला होता. आसाम आघाडीवर महायुद्धात जपानी आक्रमकांशी त्यांचा मुकाबला झाला. 43 च्या ऑगस्टमध्ये म्यानमारमधील आराकान पर्वतावरच्या टेहेळणीच्या वेळी झालेल्या जपानी सैनिकांचा मारा चुकवून विमान ढाक्‍क्‍याला उतरवून 4 दिवसांच्या मुक्कामानंतर ते बिसपूरला परतले, तर नोव्हेंबरअखेरीला आगरतळ्याच्या विमानतळावरील कंट्रोल टॉवरचे रक्षण करताना जपानी विमानातून झालेल्या गोळीबारात जखमी झाल्याने सिल्वरच्या रुग्णालयामध्ये त्यांना उपचार घ्यावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT