Ajit Pawar-Devendra Fadnavis
Ajit Pawar-Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Pawar-Fadnavis : सरकार पाडण्याच्या फडणवीसांच्या ‘त्या’ खेळीची अजित पवारांनी केली पोलखोल

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आमचं महाविकास आघाडीचं (Mahavikas aghadi) सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय बोलत नव्हते. पण, गप्प बसून पहिल्या दिवसापासून त्यांचं काम सुरू झालं होतं. ते काम करताना वेशभूषा बदलूनही ते यायचे, हे सर्व कोणी सांगितलं आहे, हे सर्वांना माहिती आहे. आमचं सरकार पडेपर्यंत त्यांच्या तोंडाला कुलूप होतं. पण, त्यांचं सरकार आल्यावर त्यांनीच कोणाला फोन करून कुठंकुठं पाठवलं हे सांगितलं आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ठाकरे सरकार पाडण्यामागच्या देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीची पोलखोल केली. (Ajit Pawar criticizes Devendra Fadnavis)

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर बोलताना अजित पवार यांनी फडणवीसांना झोडून काढले. ते म्हणाले की, नगरविकास खात्याला ८ हजार ९४५ कोटी म्हणजे जवळपास नऊ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मुख्यमंत्र्यांच्या खातं आहे, त्यामुळे निधी दिला असेल, त्यावर कुणाचं दुमत नाही. पण, त्यातील ४ अजार ५१० कोटी रुपये ठोक तरतूद केली आहे. आमचे जयंतराव नाहीत. त्यांनी ठोक हा शब्द कुठून काढला माहिती नाही. पण त्या ठोकनी नुसती ठोकाठोकीच चालवली आहे.

एवढी मोठी तरतूद अशा पद्धतीने असेल तर कसं चालेल. आता वेगवेगळ्या लोकांना सांगितलं जाईल की ‘चल तू इकडं ये, तुला असं करतो. चल तू तिकडं ये, तुला असं करतो.’ हे आपल्या राज्यात कधीच नव्हतं. पण, आपण सगळी राजकारण करणारीच मंडळी आहोत, आपण काय कोणी साधूसंत नाही आहोत. त्यामुळे प्रत्येकाला आपलं सरकार स्थापन करायचं असतं, असेही पवार यांनी नमूद केले.

पवार म्हणाले की, आमचं सरकार स्थापन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय बोलत नव्हते. पण गप्प बसून पहिल्या दिवसापासून त्यांनी काम सुरू झालं होतं. ते काम करताना ते वेशभूषा बदलूनही ते यायचे, हे सर्व कोणी सांगितलं आहे, हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्याच्या खोलात मी जात नाही. हे करता करता त्यांनी शेवटपर्यंत स्वतःच्या तोंडाला कुलूप लावलं होतं. पण, हे सर्व झाल्यावर म्हणाले की, मी याला फोन केला, तू इकडं जा. मी त्याला फोन केला, तू तिकडं जा. तुला मंत्रीपद देतो, तुला असं करतो, तुला तसं करतो, असं म्हणून या आमदारांना तिकडं पाठवलं. एके दिवशी खुशाल बोलता बोलता फडणवीस म्हणाले की, ‘मी बदला घेतला,’ हे तुमच्या इमेजला अजिबात शोभलं नाही. उपमुख्यमंत्री तुमच्या तोंडी बदला हा शब्द. हा शब्द तुम्हाला पटतो का, असा सवालही पवार यांनी फडणवीस यांना विचारला.

पवारांचं भाषण सुरू असताना समोरच्या सत्ताधारी बाकावरून ‘हे विदर्भाचे अधिवेशन आहे,’ असे म्हटलं. त्यावर अजित पवार म्हणाले की, हो मीही विदर्भाच्या नेत्यावरच बोलतोय. चंद्रकांतदादा, आता मी तुमची बाजू घ्यायला लागलोय तरी बसून बसून तुमचं सुरूच आहे का. तेवढ्यात समोरच्या बाकावरून ‘तुम्ही विसरला की काय,’ असे म्हणताच अजित पवार म्हणाले, मी काही विसरलो नाही. मला सगळं माहिती आहे. सकाळी आठच्या शपथविधीपासून सगळं माहिती आहे. (हे वाक्य उच्चारताच अजित पवारांसह सर्व सभागृहा हस्यकल्लोळात बुडाले.) फक्त मी बोलणार नाही. आम्हाला दोघांनाच माहिती आहे काय ते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT