Narendra Modi-Ajit Pawar-Shalinitai Patil Sarkarnama
विशेष

Shalinitai Attack On Ajitdada : ‘अजितदादांनी राष्ट्रवादी फोडण्याची सुपारी घेतली; मोदींनी सुपारीचं राजकारण सुरू केलं’

Vijaykumar Dudhale

Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून तो भारतीय जनता पक्षाच्या चरणी अर्पण करायचा, याची सुपारी अजित पवार यांनी घेतली आहे. त्याच्या बदल्यात त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपद हवं आहे. त्याचं आश्वासन अजित पवार यांना मिळालं आहे, असा गौप्यस्फोट शालिनीताई पाटील यांनी केला. (Ajit Pawar took betel nut to break NCP : Shalinitai Patil)

त्या म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये मतभेद झाल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचं चिन्ह, नाव मागितलं नाही. तसं अजित पवार यांनीही काही मागू नये. त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करावा. प्रयत्नांनी काही न मिळविता लोकांचं फोडून घ्यायचं, हे त्यांचे स्वार्थी राजकारण आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुपारीचं राजकारण आणलं आहे. हे आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्या सुपारीच्या राजकारणाला त्याची जागा दाखवून देऊ, निदान आमच्या भागापुरते तरी. आमच्या सातारा लोकसभा मतदारसंघातून 'इंडिया' आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. एवढंचं नाही तर मोदींच्या सुपारीवाल्या पक्षाला सातारा जिल्ह्याच्या बाहेर हाकलून देऊ, असा टोलाही शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांना लगावला.

त्या म्हणाल्या की, अजित पवार गटातील आमदार आणि खासदार हे शरद पवार यांच्या नावाने निवडून आले आहेत. आता त्यांनी निवडून येऊन दाखवावं. निवडणुकीच्या अगोदरच अजित पवार हे जेलमध्ये गेलेले असतील, त्यांची जागा तीच आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. त्या पाच वर्षांत सरकारचे 70 हजार कोटी खर्च केले. त्या खर्चात जेवढं पाणी उपलब्ध होणे आवश्यक होते, त्याच्या फक्त एक टक्का पाणी उपलब्ध झाले होते. उर्वरीत 99 टक्के पैसे पाण्यात गेले होते. म्हणजे अजित पवार यांच्या खिशात गेले होते, असा आरोपही शालिनीताई पाटील यांनी केला.

घोटाळेबाज लोकांना कोणत्याही सरकारनं सोबत घेणे, त्यांना सत्तेवर बसवणं, हा आमचा अपमान आहे. घोटाळेबाज लोकांच्या हातात तुम्ही राजदंड दिला आणि ते स्वतःला कधी शिक्षा करून घेणार? पहिले त्यांना सत्तेवरून खाली खेचा आणि कोर्टात उभे करा. ते निर्दोष असतील तर पुन्हा येतील. त्याला आम्ही नाही म्हणत नाही. तुम्ही एक हजार रुपये घेणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल शिक्षा करता आणि 25 हजार कोटींचा गैरव्यवहार केला त्यांना सोबत घेता, असा सवालही शालिनीताई पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT