Devendra Fadnavis-Eknath Shinde-Jayant Patil Sarkarnama
विशेष

Assembly Winter Session : जयंतरावांचे चिमटे अन्‌ कोपरखळ्या : ‘ट्रीपल इंजिनमुळे ट्रबल वाढला, जे दादांना कळलं, ते तुम्हाला...’

Vijaykumar Dudhale

Nagpur News : अल्पकालीन चर्चेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना जोरदार टोले आणि कोपरखळ्या लगावल्या. जयंत पाटलांच्या चिमट्यांना सत्ताधारी बाकावरून टिपण्णी करून दाद मिळत होती. ट्रीपल इंजिनमुळे वेगाने सरकार चालेल, अशी अपेक्षा होती. पण, ट्रीपल इंजिनऐवजी ट्रबल जरा जास्त वाढल्याचे सरकारकडे बघताना दिसून येत आहे, असा चिमटा पाटील यांनी सरकारला काढला. (Jayant Patil's strong batting against the government in the assembly)

जयंत पाटील म्हणाले की, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणं आणि मोठमोठ्या इव्हेंटमध्ये गुंतून राहणं, हे आम्ही गेल्या तीन ते चार महिन्यांत जवळून पाहिलं आहे. ट्रीपल इंजिनची सरकार म्हटल्यावर चांगली प्रगती होईल, असं लोकांना वाटलं होतं. तिसरं इंजिन जोडल्यावर अधिक वेगाने सरकार चालेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ट्रीपल इंजिनच्या ऐवजी ड्रबल जरा जास्त वाढलं आहे, असं सरकारकडे बघाताना आम्हाला दिसतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयंत पाटील बोलत असताना सत्ताधारी बाकावरून ‘जोरात बोला’ अशी सूचना आली. त्यावर जयंत पाटलांनीही हजरजबाबी उत्तर दिले. मला माहिती आहे की, मी सरकारच्या विरोधात जोरात बोलावं, अशी तुमची इच्छा आहे, ते होईल. फक्त दहा मिनिटं थांब. मुख्यमंत्री महोदय, सरकारमधील एक मंत्री मला सांगत आहेत की, सरकारच्या विरोधात जरा जोरात बोला. त्यावर सरकारी बाकांवरून ‘तुमचा आवाज सध्या बसला आहे,’ नरमले आहेत,’ अशा कमेंट आल्या. त्यावरही जयंतरावांनी कढी केली. मुख्यमंत्री हे तुम्हाला बरं वाटावं; म्हणून असं आता बोलत आहेत. पण मी तुमच्या विरोधात जोरात बोलावं, अशी त्यांची भावना दिसत आहे.

दुष्काळ जाहीर करून सरकारने जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. पण, दुष्काळ जाहीर करतानाही दुजाभाव दाखवला आहे. काही भागात दुष्काळ जाहीर करून नुसतं तोंडाला पानं पुसण्याचं काम केले आहे. अर्धवट दुष्काळ जाहीर केला आहे. असं असतानाही तुटपुंज्या पाण्यावर आणलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. अवकाळी पावसाचा २२ जिल्ह्यांत फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पंचनामेही करण्यात आलेले नाहीत, असा आरोप जयंतरावांनी केला.

इथं आपला संसार फाटलाय

बळिराजा अवकाळी आणि गारपीटीचा मार सहन करत आहेत. पण, राज्याचे मंत्री शेजारच्या राज्यात प्रचारात गुंतले होते. प्रचार करायला जायला आमची हरकत नाही. पण इथं आपला संसार फाटायला निघाला आहे आणि आपले मंत्री दुसऱ्यांचा संसार जोडायला महाराष्ट्राबाहेर पळत आहेत, हे चित्र महाराष्ट्राला बरं नाही. तेवढ्या सत्ताधारी बाकावरून ‘त्या राज्यांत आमचा विजय झाला,’ अशी टिपण्णी आमदार सावरकर यांनी केली.

मोदी यांची इमेज

जयंत पाटील यांनी त्यालाही सडेतोड उत्तर दिलं. तुमचा तिकडं विजय झाला, त्याचा आनंद आहे. पण, त्या ठिकाणी मोदी यांची इमेज होती. तुम्हाला तिकडं जाण्याची गरज नव्हती. नाही तर तुम्हाला कोण विचारतो तिकडं, असा सणसणीत टोला पाटील यांनी लगावला.

मी तिथं जाऊन काय दिवा लावणार होतो?

मी समजू शकतो मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री प्रचाराला गेले. पण तिसरे उपमुख्यमंत्री प्रचारालाच गेले नाहीत. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही उत्तर दिलं. ‘मी तिथं जाऊन काय दिवा लावणार होतो, तिथं मोदी यांच्या नावावर निवडून येणार होते,’ असे म्हटले. त्यावर जयंत पाटील यांनी ‘हेच मी त्यांना सांगतोय. तुम्ही जाऊन काय फरक पडतो. जे दादांना कळलं, ते तुम्हाला अजून कळलं नाही,’ असं प्रत्युत्तर दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT