Bhushan Gavai-Devendra Fadnavis  Sarkarnama
विशेष

CJI Bhushan Gavai : '...तेव्हा भूषण गवई आमदार निवास खोलीत लोकांची राहायची सोय करायचे अन्‌ स्वतः व्हरांड्यात बसून अभ्यास करायचे'

Devendra Fadnavis Speech : नव्या वकिलाची बाजूही भूषण गवई मांडायचे. ही बाजू मांड, ती न्यायायाची आहे, असे ते वकिलांना सांगायचे आणि त्यानंतर ते निकाल द्यायचे, त्यामुळे नव्या वकिलांना गवईंच्या कोर्टात उभे राहायला आवडायचं, कारण चुकलं तर शिव्या पडणार नाहीत, हे त्यांना माहिती असायचं.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 08 July : मधल्या काळात ‘दादासाहेबांना (रा. सू. गवई) पदावरून खाली यावं लागलं. त्यामुळे ते आमदार निवासाला राहायला गेले. आमदार निवासात किती लोकं असतात, हे आपल्याला माहिती आहे. भूषण गवई त्या ठिकाण अभ्यासाला होते. पण, दादासाहेबांना भेटायला लोकही भरपूर यायचे. त्यावेळी भूषण गवई हे आमदार निवासाच्या खोलीत लोकांची राहायची सोय करायचे आणि स्वतः व्हरांड्यात बसून अभ्यास करायचे. त्याही परिस्थितीत त्यांनी अभ्यासात कधी खंड पडू दिला नाही, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai ) यांचा महाराष्ट्र विधीमंडळाच्या वतीने आज मुंबईत सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष डॉ राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपसभापती नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, तसेच विधीमंडळातील गटनेते, प्रतोद व मान्यवरांची उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, भूषण गवई हे नगरपालिकेच्या शाळेत शिकत होते. त्यांना सातवीपर्यंत इंग्रजीचा गंध नव्हता, सातवीला जेव्हा इंग्रजी आलं, तेव्हा मातोश्री कमलताईंना वाटलं की आता भूषण गवई यांचं काय होणार. पण ते पहिल्या क्रमांकाने पास झाले.

कॉलेज जीवनापासून त्यांनी निवडणुका, इतर उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी कायद्याचा मार्ग निवडला आणि आज कायद्याच्या विभागात ते आज सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एक मराठी माणूस सर्वोच्च पदावर पोचला, त्याचा आम्हाला अतिशय गर्व आहे.

झुडपी जंगलाच्या संदर्भात त्यांनी दिलेला निकाल महाराष्ट्र आणि विदर्भासाठी महत्वपूर्ण ठरला. महाराष्ट्रातील सर्व पुढारी त्याच विषयावर पंतप्रधानांपासून सर्वांना भेट होतो. पण, भूषण गवई यांनी व्यापक जनहित लक्षात घेऊन त्याबाबत जजमेंट दिले. त्यातून विदर्भाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला, असेही फडणवीसांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, नव्या वकिलाची बाजूही भूषण गवई मांडायचे. ही बाजू मांड, ती न्यायायाची आहे, असे ते वकिलांना सांगायचे आणि त्यानंतर ते निकाल द्यायचे, त्यामुळे नव्या वकिलांना गवईंच्या कोर्टात उभे राहायला आवडायचं, कारण चुकलं तर शिव्या पडणार नाहीत, हे त्यांना माहिती असायचं. वकिलांचं बहुमत घेतलं तर तीन चतुर्थांश बहुमत त्यांना मिळेल. भूषण गवई यांनी न्यायालय आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम केले.

सर्वोच्च न्यायालयात काम करताना शनिवार आणि रविवारी ते कधीही दिल्लीत राहिले नाहीत. ते देशभरातील कोर्टात, वकिल संघटनांच्या कार्यक्रमात लेक्चर देण्यासाठी फिरत असतात. त्यांनी सुटी घेतली आहे, असे कधी पहायलाच मिळालं नाही. त्यांच्या शपथविधीसाठी देशभरातील लोक, वकील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कारण त्यांचा संपर्क मोठा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, आज जे भूषण गवई आपल्याला दिसतात, त्यांच्या पाठीशी दादासाहेब गवई आहेत. कुठलीही गोष्ट ध्येयासारखी बाळगायची, अशाच पद्धतीने ते काम करत असतात. जो काळ भूषण गवई यांना सरन्यायाधीश म्हणून मिळाला आहे, त्या कालावधीत ते असं काम करतील की, ज्या दिवशी ते सरन्यायाधीशपद सोडतील, तेव्हा एक इतिहास त्यांनी निर्माण केलेला असेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. सामान्य माणूस कसा असामान्य होऊ शकतो, हे भूषण गवई यांनी दाखवून दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT