Navneet Rana-Ravi Rana-Vinayak Raut-Raj thackeray
Navneet Rana-Ravi Rana-Vinayak Raut-Raj thackeray Sarkarnama
विशेष

'भाजपच्या कपटनीतीचे दोन मोहरे, एक राणा दांपत्य अन्‌ दुसरे राज ठाकरे!'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्र सरकारला त्रास द्यायचा, अडचणी निर्माण करायच्या. शांतता-सुव्यवस्था बिघडेल, अशी परिस्थिती निर्माण करायची. विजनिर्मितीसाठी कोळशाचा पुरवठा करायचा नाही, राज्यात भारनियमन होईल, हे पाहायचे. त्यातून असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा, असे प्रकार भारतीय जनता पक्षाकडून (BJP) होत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सुरू असलेले काम कसे बिघडवता येईल, या दृष्टीकोनातून भाजपची ही कपटनीती चालली आहे. या कपटनीतीचे दोन मोहरे आहेत, त्यातील एक राणा दांपत्य (Navneet Rana &Ravi Rana) आणि दुसरे मनसेचे राज ठाकरे (Raj Thackeray) आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली. (BJP is using Rana couple : Vinayak Raut)

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री निवास स्थानासमोर उद्या (ता. २३ एप्रिल) सकाळी हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर राऊत हे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि राणा दांपत्याने शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. भाजपचे नेते राणांचा शिखंडीसारखा वापर करून शिवसेनेवर बाण सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, शिवसेनेचा धनुष्यबाण एवढा ताकदवान आहे की, अशा शिखंंडींचा निप्पात करतील आणि महाआघाडीचे सरकार यापुढेही जनतेच्या सेवेत काम करत राहील.

ज्याला कावीळ झालेली असते, त्यांना सर्व पिवळंच दिसतं. त्या प्रमाणे भाजप नेत्यांना महाविकास आघाडीचे सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा द्वेष आहे. मला त्यांना विचारायचं आहे की, संपूर्ण देशात भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या कामाचा आलेख काय आहे. आम्हाला अभिमान आहे की, केंद्रीय यंत्रणांचा एवढा मोठा जाच असून, भाजपच्या केंद्र सरकारने त्रास देऊनही कोरोना काळात आणि सद्या स्थितीत केलेल्या कामांमुळे देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश होतो. हाच जळफळाट भाजप नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला त्रास द्यायचा, अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या या कपटनीतीचे राज ठाकरे आणि राणा दांपत्य असे दोन मोहोरे आहेत, असेही खासदार राऊत यांनी नमूद केले.

विनायक राऊत म्हणाले की, विदर्भातील प्रलंबित कामाला राणा दांपत्यांनी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरण्याअगोदर स्वतः ज्या पक्षाची तुम्ही तळ उचलता त्या पक्षाच्या केंद्र सरकारने महाराष्ट्राला काय दिले, हेही सांगण्याची गरज आहे. जीएसटी, मुंबईसह इतर महापालिकांचे साडेचार हजार कोटी रुपये दिले नाहीत. एकीकडे वेगवेगळ्या अडचणी निर्माण करायच्या आणि दुसरीकडे अशा पद्धतीने ट्विव ट्विव करायची, ही राणा दांपत्याची सवय आहे. आम्ही (शिवसेना) राणा दांपत्याला फार किमत देत नाही. आम्ही त्यांना कस्पटासमान मानतो. शिवसेनेच्या दृष्टीकोनातून राणा दांपत्य म्हणजे किस झाड की पत्ती आहे. आम्ही त्यांना अजिबात किमत देत नाही. पण, त्याचे बोलविते धनी जे आहेत, त्या भारतीय जनता पक्षाला आम्हाला मुंबई महापालिका आणि राज्यातील निवडणुकीत धडा शिकवावच लागेल आणि त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीच्या रणांगणात उतरलो आहोत.

महाराष्ट्राचं भलं व्हावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे काम करत आहेत, ती कामे जनतेपर्यंत घेऊन जावं आणि त्याचबरोबच ही जी जळमटं फिरत आहेत, त्यांनाही त्यांची जागा दाखवून द्यावी, हे शिवसेनेचे काम आहे. मातोश्री आमचं दैवत आहे, त्या दैवतासमोर भक्त बसतात. पण काहींना असं वाटलं की आपण मुंबईला जावं आणि शिवसैनिकांनी जो महाप्रसाद तयार केला आहे, त्या महाप्रसादाचा स्वीकार करावा, असं स्वप्न ज्यांना पडलं. त्यांना महाप्रसादाचं वाटप करण्यासाठी आम्ही मातोश्रीपुढे बसलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची ज्यांनी सुपारी घेतली आहे, त्या भाजपच्या माध्यमातून हे जे चाळे केले जात आहेत. हे माकडे चाळे आहेत, त्या माकड चाळ्यांना थांबविणे, ही काळाची गरज आहे. शिवसेनाला आव्हान देण्याची ज्यांना दुर्बुद्धी सुचली आहे, त्याचा मुकाबला करणे, हे शिवसेनेचे काम आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT