Jalgaon Politics : सत्तेचं आकर्षण, राजकीय पदांची महत्त्वाकांक्षा, काही चुकीचे केले असेल तर कारवाईची भीती आणि आणखी काही कारणं असतील. पण, अलीकडच्या काळात राजकारणाच्या सारीपाटावर विरोधी पक्षांत थांबायला कुणी तयारच नाही, अशी स्थिती निर्माण झालीय. एकतर विरोधी पक्षात राहून संघर्ष करण्याची या नेत्यांची मानसिकता नाही, तेवढा त्यांचा संयमही नाही आणि दुसरे म्हणजे सत्ताधारी पक्षात राहून आपली कामं साधायची, हा त्यामागचा उद्देश. सत्तेत असलेल्या पक्षांत प्रवेश करण्याचा हा ‘ट्रेंड’ पक्ष, तत्त्व, निष्ठा यासारख्या शब्दांना तिलांजली देणारा ठरतोय...
राज्याच्या राजकारणात गेल्या तीन-साडेतीन वर्षांत जे बदल घडलेत, त्या बदलांबाबत केवळ अनपेक्षित असे न म्हणता आश्चर्यकारक, अनाकलणीय असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. 2022 ते 2024 अशा केवळ अडीच वर्षांत राज्याने महाविकास आघाडी, शिवसेना-भाजप युती व नंतर 2024 च्या विधानसभा निवडणूक पश्चात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा महायुतीची तीन सरकारे अनुभवली. अनुक्रमे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांनी तीनही सरकारांचे नेतृत्व केले. अर्थात, जुलै 2022 आधीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राने भाजप- राष्ट्रवादी (पहाटेचा शपथविधी) व शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सरकारचा धक्कादायक बदल पाहिला होता. त्यामुळे त्यानंतरच्या काळात झालेले बदल अनपेक्षित व धक्कादायक असले तरी त्याचा राज्यातील जनतेच्या मनावर तितकासा परिणाम झाला नाही, हा भाग वेगळा असो.
पण, या तीन वेगवेगळ्या सरकारांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत सत्तेतील पक्षांमध्ये स्वत:ला सामावून घेण्याचा जो ‘ट्रेंड’ आला आहे, तो राजकारणातील एकूणच एकनिष्ठता, प्रामाणिकपणा व तत्त्वांना काळीमा फासणारा आहे. राज्यभरात विरोधी पक्षातून सत्तेत असलेल्या पक्षांत प्रवेश करण्याची जी काही मालिका सुरू आहे, त्याला अर्थातच जळगाव जिल्हाही अपवाद नाही. किंबहुना गेल्या वर्षभरात, विशेषत: विधानसभा निवडणुकीनंतरच्या काळात जळगाव जिल्ह्यात नेत्यांनी सत्तेतील पक्षांत प्रवेश करण्याचा जो सपाटा लावलांय, तो पाहता विरोधी पक्षांत कुणी नेता उरेल की नाही? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
गत आठवड्यात पाचोऱ्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. मुळात, श्रीमती सूर्यवंशी यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या तिकिटावर त्यांचेच चुलत बंधू किशोर पाटील यांच्याविरोधात ताकदीने लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र, वर्षभरही न थांबता त्यांनी भाजपचा तंबू गाठला. त्यांच्याआधी माजी आमदार दिलीप वाघही भाजपत प्रवेश करते झालेत. महायुतीच्या समीकरणात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे, विद्यमान आमदारही शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे किशोर पाटलांच्या विरोधातील सर्व नेते मित्रपक्ष असलेल्या भाजपत का जातांय? असा प्रश्नही उपस्थित होतोय.
पक्षबदलाची ही मालिका खरेतर विधानसभा निवडणूक संपल्यानंतर लगेचच सुरू झाली. कारण, याआधीही ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दैवत मानणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास गोरख पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील विष्णू भंगाळेंनी गेल्या काळात शिवसेना गाठत जिल्हाप्रमुखपदही मिळविले. त्यापाठोपाठ पराग मोरे, रोहन मोरे यांनीही भाजपत प्रवेश केला. गेल्या आठवड्यात कॉंग्रेसच्या राज्यस्तरावरील नेत्या प्रतिभा शिंदेंच्या गळ्यात जळगावातील दौऱ्यात अजित पवारांनी राष्ट्रवादीचा गमछा घातला आणि त्यांच्या पाठोपाठ वैशाली सूर्यवंशी भाजपत प्रवेश करत्या झाल्या. विरोधी पक्षांच्या तंबूत कुणी नेते, कार्यकर्ते थांबायला तयार नसतील, तर येणाऱ्या काळात जिल्ह्यातील राजकीय चित्र कसे असेल, त्याची कल्पनाच केलेली बरी!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.