Manoj Jarange  sarkarnama
विशेष

Manoj Jarange News : विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपच्या 'या' तीन बड्या नेत्यांनी घेतली जरांगेंची भेट

Sachin Waghmare

Jalana News : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांसह मराठा समाजाला ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा नुकताच केला. 29 ऑगस्टला जरांगे निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यातच राज्यातील भाजपच्या तीन बड्या नेत्यांनी उमेदवारीसाठी जरांगेंची भेट घेतल्याचे पुढे आले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सध्या निवडणुकीची घोषणा होण्याची सर्वच जण वाट पाहत असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांनीही उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांत मनोज जरांगे यांची भाजपच्या (Bjp) नेत्यांनी भेट घेत त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली. (Manoj Jarange News )

अंतरवाली सराटीत येत नांदेड जिल्ह्यातील भाजपच्या नेत्या मिनल खतगावकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. खतगावकर या नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. या ठिकाणी भाजपचे राजेश पवार हे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांनी जरांगे यांची भेट घेतल्याचे समजते.

त्यानंतर बीड जिल्ह्यातील केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत थेट तिकीटाचीच मागणी केली. त्या केज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्याठिकाणी सध्या भाजपच्या नमिता मुंदडा आमदार आहेत. ठोंबरे यांनी काही दिवसापुर्वीच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी देण्याची मागणी केली होती.

बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली असल्याचे समजते. पण म्हस्के यांनी जरांगेंकडील भेटीनंतर उमेदवारीबाबत थेटपणे बोलणे टाळले आहे. भाजपच्या या बड्या तीन नेत्यांनीच उमेदवारीसाठी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दुसरीकडे जरांगे पाटील यांनी येत्या काळात तात्काळ आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, नाहीतर उमेदवार पाडणारच असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. निवडणूक लढणार की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडणार, हे 29 तारखेला जरांगे ठरवणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 29 ऑगस्टपर्यंतची डेडलाइन दिली आहे. त्यानंतर जरांगे हे निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT